नजीकच्या काळात निफ्टीत 200 अंकांची घट होण्याची शक्यता
मुंबई – अर्थसंकल्पानंतर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1,500 अंकांनी कमी झालेला आहे. त्यामुळे आता विक्री थांबून खरेदी वाढेल, असे समजले जात असले तरी कंपन्यांची एकूण परिस्थिती पाहता निर्देशांकात आणखी घट होण्याची शक्यता काही ब्रोकर्सनी व्यक्त केली आहे.
गेल्या 18 महिन्यापासून कंपन्यांच्या ताळेबंदावर नकारात्मक परिणाम झालेला आहे. आता पहिल्या तिमाहीत कंपन्यांचे ताळेबंद चांगले असण्याची कसलीही चिन्हे नाहीत. अर्थसंकल्पातून मागणीला चालना दिली जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, तसे काही न झाल्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत कंपन्यांचा नफा आणि लाभांश कमी राहण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गुंतवणूकदारांना खरेदी करण्याचे कसलेही कारण दिसत नाही. त्यातच अर्थमंत्र्यांनी गुंतवणूकदारांना नाराज करणारे अनेक निर्णय घेतलेले आहेत. अतिश्रीमंतावर, त्याचबरोबर परदेशी गुंतवणूकदारांवर बराच कर लावलेला आहे. एवढेच नाही तर बायबॅकवर 20 टक्के कर लावलेला आहे. या सर्व कारणांमुळे गेल्या आठवड्यात विक्री झाली आहे. ही विक्री काही काळ आणखी चालू राहण्याची शक्यता विश्लेषकांना वाटते. निर्यात करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान कंपन्यांकडून गुंतवणूकदारांना बरीच अपेक्षा होती. मात्र, त्या आघाडीवरही परिस्थिती नकारात्मक राहण्याची शक्यता असल्यामुळे पुढील दोन महिन्यात निफ्टी 200 ते 300 अंकांनी कमी होऊ शकतो. परिस्थिती सुधारली नाही तर या वर्षात आणखी करेक्शन होऊ शकते असे ब्रोकर्स वाटते.
काही ब्रोकर्सनी सांगितले की, आतापर्यंत कंपन्यांचे ताळेबंद नकारात्मक असूनही गुंतवणूकदारांनी बरीच खरेदी केली होती मात्र, अशीच परिस्थिती पुढे राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हे करेक्शन आणखी काही काळ टिकू शकते