अकोला- वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालात मुस्लिम मतांची साथ न मिळाल्यानेच पराभव झाल्याचे वक्तव्य केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलतांना ते म्हणाले, ‘औरंगाबाद सोडून कोठेही वंचित आघाडीला मुस्लिम मत मिळाली नाहीत. त्यामुळे औरंगाबादमध्येच आम्हाला विजय प्राप्त करता आला. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून या वक्तव्यावर असदुद्दीन ओवैसी काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणूकीतील दारूण पराभवाच्या धक्क्यातून सावरलेल्या वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा मुद्यावर पुण्यातील बैठकीत चर्चा केली होती. तसेच पुण्यातील बैठकीत राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणूकमध्ये वंचित बहुजन आघाडी ही प्रमुख विरोधाची भूमिका पार पाडेल.’ असेही ते म्हणाले होते.