समृद्धी मार्गाचे काम बंद करण्याचे आंदोलन काळे यांनी केले स्थगित
कोपरगाव – शहरातील नागरिकांची पाणी टंचाई पासून कायमची सुटका व्हावी, यासाठी आशुतोष काळे यांनी मागील आठ दिवसांपासून गायत्री कन्स्ट्रक्शन कंपनीने 5 नंबर साठवण तलावाचे काम करावे व कोपरगाव नगरपरिषदेनेही तातडीने 4 नंबर व 5 नंबर साठवण तलावाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करावे, या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व गायत्री कन्स्ट्रक्शनचे उपाध्यक्ष रेड्डी यांच्या समवेत बैठक पार पडली. त्यात सकारात्मक निर्णय झाल्याने काळे समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडण्याचे आंदोलन स्थगित केले आहे. मात्र धरणे आंदोलन सुरूच ठेवले आहे.
या बैठकीत गायत्री कंपनीचे उपाध्यक्ष रेड्डी यांनी पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्यास तयार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना सांगितले असल्याची काळे यांनी माहिती दिली आहे. कोपरगाव नगरपरिषदेने या पाच नंबर साठवण तलावाचे काम करण्यासाठी साठवण तलावाचा आराखडा करून द्यावा, असे पार पडलेल्या बैठकीत रेड्डी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आहे. त्यामुळे (दि.4) रोजी प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार योगेश चंद्रे हे आंदोलन स्थळी येवून त्याबाबत सविस्तर चर्चा करणार असल्याचे आशुतोष काळे यांनी सांगितले आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम बंद करणार असल्याचे आंदोलन स्थगित करीत असून, धरणे आंदोलन मात्र सुरूच राहणार असल्याचे आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
पाणीप्रश्नी मागील आठ दिवसांपूर्वी धरणे आंदोलन सुरू केले. या आठ दिवसांत शहरातील सर्व सामाजिक संघटना, व्यापारी बंधू व सर्व महिला भगिनी, सामान्य नागरिकांनी आंदोलनास पाठिंबा दिला. त्यामुळे झालेला निर्णय हा केवळ नागरिकांच्या पाठबळावरच झाला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी व नागरिकांचे मनापासून आभार.
आशुतोष काळे ,युवा नेते