पुणे – पारंपरिक इंधने एक दिवस संपुष्टात येणार हे वास्तव आहे. म्हणूनच शाश्वत आणि अक्षय अशा सौर उर्जेचा वापर वाढवणे गरजेचे आहे. केंद्र सरकार आणि देशातील प्रत्येक राज्य सरकारने अलीकडेच अपारंपरिक उर्जेला प्रोत्साहन देण्याचे धोरणही जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात सौर ऊर्जा निर्मिती ही काळाची असेल, असे प्रतिपादन तज्ज्ञ ए. रघुराम यांनी केले.
एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, केअर्स रिनेव्हबल आणि शून्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सोलर पीव्ही सिस्टीम रिसर्च सेंटर’च्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केअर्स कंपनीचे संचालक सिवा हर्ष एस, शून्य पुणे कंपनीचे निखिल मंगलोरी, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय आदी उपस्थित होते.
रघुराम म्हणाले, उद्योग जगताने ही अपारंपरिक उर्जा साधनांच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करून स्वतःची गरज भागविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. भविष्यात पाणी आणि वीज या महत्त्वाच्या समस्या असणार आहे. त्यावर मात करण्यासाठी नवीन शोध घेऊन नवनिर्मिती करणे गरजेचे आहे.