इंदोरी, (वार्ताहर) – वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा, त्यामुळे विस्कळीत होणारा पाणी पुरवठा, दिवसेंदिवस वाढत जाणारे वीजबील या त्रासातून इंदोरीकरांची सुटका होणार आहे. कारण कॅडबरी कंपनीने इंदोरी ग्रामपंचायतीला गावात सौरउर्जा प्रकल्प उभारण्यास तब्बल ६० लाख रुपयांचा सीएसआर फंड दिला आहे. केवळ घोषणा करून कंपनी थांबलेली नाही. तर प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाल्याने ग्रामस्थांकडून आनंद व्यक्त होत आहे.
इंदोरी ग्रामपंचायतीस दरवर्षाला सुमारे १ कोटी ११ लाख रुपयांचा मिळकतकर तर पाणीपट्टीची सुमारे १७ लाख ३० हजार रुपये भरणा अपेक्षित आहे. या पैशातूनच गावाचा विकास व इतर खर्च केला जातो. मात्र मिळकतकर पाणीपट्टीचा भरणा करदात्यांकडून नियमितपणे होत नाही. ग्रामपंचातीकडून कर भरण्यासाठी वारंवार आवाहन करूनही करवसुली अवघी ३० ते ४० टक्के इतकीच होते.
त्यामुळे इंदोरी ग्रामपंचायतीची थकीत करबाकी दरवर्षी वाढतच आहे. कर वसुलीसाठी ग्रामपंचायतीला कठोर निर्णयही घेत येत नाही. परिणामी, पथदिव्यांचे व पाणी पुरवठ्याचे वीज बिल ग्रामपंचायतीस भरणे अशक्य होत आहे. या नेहमीच्या आर्थिक संकटामुळे वीज खंडित होण्याची कायम टांगती तलवार असते.
जर महावितरणने थकीत वीजबिलापोटी पुरवठा खंडीत केला तर रात्रीच्यावेळी संपूर्ण गाव अंधारात जाईल. तसेच ग्रामस्थांना पाणी पुरवठाही करता येणार नाही. ग्रामपंचातीमधील यंत्रणाही ठप्प होईल. परिणामी नागरिकांना विविध कामे व त्यांची दैनंदिन कामे करता येणार नाही.
हे संकट कायमचे दूर व्हावे म्हणून ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन व कॅडबरी कंपनी कामगार संघटना यांनी सौरउर्जेचा हा प्रस्ताव कॅडबरी कंपनीचे व्यवस्थापनाकडे मांडला. त्यावर सकारात्मक चर्चा होऊन सीएसआर निधीतून कंपनीने ६० लाख खर्चाचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे मान्य केले होते.
सौरउर्जा प्रकल्पाबाबत बोलताना सरपंच शशिकांत शिंदे व उपसरपंच स्वप्नील शेवकर म्हणाले की, विद्युत मोटारीद्वारे केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याचे वीज बील पाणीपट्टीतून तर पथदिव्यांचे वीज बील ग्राम निधीतून दिले जाते. मात्र, ग्रामपंचायतीकडून कर वसुली अल्प होत असल्याने वीज बील ही मोठ्या प्रमाणात थकीत असते. गेल्यावर्षी महावितरणने पथदिव्यांची वीज खंडित केली होती. महावितरणला विनंती करून पाणी पुरवठ्याची वीज खंडित होऊ दिली नाही. सुमारे ९२ लाखांचे थकीत वीज बिल हप्ते ठरवून देण्यात आले.
कामगार संघटनेचे व ग्रामपंचायत सदस्य विनोद भागवत म्हणाले की, या सौरऊर्जा प्रकल्पामुळे दरमहा दोन ते तीन लाख रुपयांच्या वीज बीलचा खर्च वाचणार आहे. त्यामुळे, अन्य विकास कामांना हातभार लागेल. ग्रामविकासासाठी कॅडबरी कंपनीकडून अधिकाधिक सीएसआर निधी मिळवण्याचा प्रयत्न कामगार संघटना करील.”
सौरउर्जा प्रकल्प उभारणीसाठी कॅडबरी कंपनीच्या सीएसआर फंडातून साठ लाख रुपये खर्च येणार आहे. कपंनीने या प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवातही केली आहे. त्यामुळे, वीजबिलासाठी होणारा मोठा खर्च वाचणार असल्याने नेहमीच्या आर्थिक संकटातून ग्रामपंचायतीची सुटका होईल. – कैलास कोळी, ग्रामविकास अधिकारी, इंदोरी ग्रामपंचायत