धोम जलाशय परिसरात डंपर चालकांची मनमानी
परिसरातील ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
मेणवली – वाई- जांभळी रस्त्यावर बेदकारपणे वाहने चालवून अपघात, दहशत निर्माण करून पश्चिम भागातील जनतेला वेठीस धरत धोम धरण क्षेत्रातील गाळाची वाहतूक करणाऱ्या विनानंबर डंपर चालकांवर निर्बंध घालून तत्काळ कडक कारवाई करणेबाबतचे निवेदन वाईचे तहसीलदार रणजीत भोसले यांना देण्यात आले.
काळेश्वरी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक ज्ञानदेव सणस रेणावळे व ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे सूचित केले आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गाळ काढण्याचे काम बेसुमारपणे दिवस रात्र सुरू आहे.
संबंधित बाब प्रशासनाच्या अख्यात्यरित येत असली तरी याबाबत कसलीही खबर अगर सूचना पश्चिम भागातील ग्रामपंचायती व ग्रामस्थांना दिलेली दिसून येत नसल्याने एक प्रकारे अन्याय झाल्याचे जाणवत आहे. तसेच धरण क्षेत्रातून काढण्यात आलेल्या गाळाचे भरलेले चलन व प्रत्यक्ष काढलेला गाळ याचा कुठलाही ताळेबंद दिसत नाही. असे असताना गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांचे चालक व मालक पश्चिम भागात दहशत निर्माण करत आहेत. अरुंद असणाऱ्या वाई -जांभळी रस्त्यावर अतिशय वेगाने वाहने चालवून वारंवार अपघातास कारणीभूत ठरत असल्याने येथील जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
अनेक छोटे-मोठे अपघात होवून अनेकजण जायबंदी झाले आहेत. अशा दुर्घटना वारंवार घडूनही वाहन चालक- मालक यांच्या दहशतीमुळे कोणीही तक्रार करण्यास धजावत नाही. यातूनही कोणी विचारणा किंवा थांबवण्याचा प्रयत्न केल्यास पश्चिम भागातील गावात टोळक्याने घुसून अनेकाना मारहाण करत प्रसंगी जीवघेण्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. धरणातील गाळ वाहणाऱ्या अनेक वाहनाना नंबर नाहीत. त्यामुळे एखाद्या दुर्घटनेत कोणाचा जीव गेला तर कोणाला जबाबदार धरायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या सर्व बाबींचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून वाहन चालक व मालक यांच्यावर कड़क कारवाई करण्यात यावी. अन्यथा संबंधितांच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी ज्ञानदेव सणस, विशाल सपकाळ, अमर बनसोडे, सचिन सपकाळ शहर अध्यक्ष, मोहन सणस, बाबुशेठ चौधरी, पांडुरंग तुपे, वाई चंद्रकांत शेलार, विक्रांत भैया डोंगरे, ग्रामस्थ संख्येने हजर होते.
धोम धरणातील गाळ काढण्यास वाई महसूल विभागाची कुठलीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळे काढण्यात आलेला गाळ हा नियमबाह्य असून तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ या पंच कमिटीच्या परवानगीशिवाय गौण खनिज उत्खनन करणे असा गुन्हा निदर्शनास घडल्यास कडक कारवाई करताना कोणालाही पाठीशी घालणार नाही.
-रणजीत भोसले, वाई तहसीलदार