छावा संघटना, चला वारीला टीमने राबविले स्वच्छता मोहीम
पुुणे – छावा संघटना व चला वारीला टीम यांच्यामाध्यमातून “वारी स्वच्छतेची पवित्र इंद्रायणीची’ या अभियानाअंतर्गत इंद्रायणी नदीची स्वच्छता करण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवत 9 ट्रॅक्टर कचरा गोळा केला.
मानवी साखळीद्वारे थेट इंद्रायणी नदीत उतरून केलेली स्वच्छता…नदी किनाऱ्यावरील स्वच्छता…जनजागृतीपर कार्यक्रम आणि नदीसंवर्धन आणि स्वच्छतेविषयक काम करण्याची शपथ अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून इंद्रायणी नदीची स्वच्छता करण्यात आली. आगामी काळातील वारी आणि त्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या जनसमुदायाच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून हे स्वच्छता अभियानाचा प्रारंभ करण्यात आला असून त्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
छावा संघटना व चला वारीला टीम यांच्या माध्यमातून आयोजित “वारी स्वच्छतेची पवित्र इंद्रायणीची” अभियान अंतर्गत इंद्रायणी नदी मधील मैला, निर्माल्य, कचरा, प्लॉस्टिक, कपडे व इतर अस्वच्छ पदार्थ बाहेर काढण्यात आले. या स्वच्छता मोहीमेमध्ये केवळ नदीकाठ परिसर स्वच्छ न करता थेट नदीमध्ये उतरुन तरुण, तरुणी, महिला आणि अबालवृद्धांनी मोठ्या प्रमाणात 9 ट्रॅक्टर भरून कचरा गोळा केला. या अभियानाबाबत संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव म्हणाले, नदी स्वच्छता ही पर्यावरण समतोल साधण्यासाठी महत्त्वाची बाब आहे. नदीतील प्रदूषण ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात आषाढी वारीसाठी भाविक भक्तांच्या काळजीच्या हेतूने आम्ही इंद्रायणी स्वच्छ केली आहे. केवळ येथेच थांबता नदी स्वच्छता आणि संवर्धन ही एक जनचळवळ व्हावी अशी आमची इच्छा असून त्यासाठी प्रयत्न करणार आहे.