देहूगाव,(वार्ताहर) – देहूलगत वाहणाऱ्या इंद्रायणी नदीपात्रामध्ये राडारोडा टाकला जात आहे. यामुळे नदीचे पात्र अरुंद होत असून पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याकडे राज्याचे पाटबंधारे विभाग व स्थानिक स्वराज्य संस्थाचे दुर्लक्ष होत आहे.
पावसाळ्यामध्ये इंद्रायणी नद्यांचे पात्र दुथडी भरून वाहत असते. शहरातील काही व्यावसायिकांकडून नदी पात्रात राजरोसपणे राडारोडा टाकला जात आहे. त्यामुळे नद्यांचे पात्र अरुंद होत चालले असून पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होवून पुराच्या पाण्याची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
इंद्रायणी नदीपात्रात भराव टाकला जात असल्याची माहिती मिळाली असून त्याची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल. संबंधितांना नोटीसही दिली जाईल. संबंधित दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल. परंतु याबाबत येलवाडी ग्रामपंचायतीकडून कसलीही परवानगी दिलेली नाही. – पूनम शेवाळे, ग्रामसेविका येलवाडी ग्रामपंचायत
संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या असून पीएमआरडीए आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनाही पत्र पाठवले जाईल. संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल. – किशोर चव्हाण, सहाय्यक अभियंता, पाटबंधारे विभाग.