पिंपरी बाजारपेठेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम
पिंपरी – पिंपरी कॅम्प येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न अद्याप कायम आहे. येथील शगुन चौक ते साई चौक या अंतरात नो पार्किंगमध्ये सर्रास दुचाकी वाहने लावण्यात येत आहेत. त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे.
पिंपरी बाजारपेठ ही शहरातील महत्वाची आणि मध्यवर्ती बाजारपेठ आहे. मुख्यत्वे कापड व्यवसाय आणि मोबाईल विक्रीचा व्यवसाय येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. कापड बाजारातील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजुने वाहतूक सुरू असते. त्यातही तीनचाकी टेम्पो आणि अवजड वाहनांतून व्यावसायिकांच्या मालाची ने-आण सुरू असते. त्यामुळे आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. त्यातच कापड व्यावसायिकांनी रस्त्यावरच अतिक्रमण करून मालाचा “डिसप्ले’ केला आहे. त्यामुळे या वाहतूक कोंडीत आधिकच भर पडते.
पिंपरी बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना चिंचवड किंवा इंदिरा गांधी उड्डाणपुलावरून पिंपरी चौक, मोरवाडी चौक आदी ठिकाणी जाण्यासाठी रिव्हर रस्त्याने जाता येते. या रस्त्यावर देखील सायंकाळी वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. विशेषत: सायंकाळी या समस्येची व्याप्ती आधिक असते. भाटनगर येथून इंदिरा गांधी उड्डाणपुलावर जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर सिग्नल बसविलेले आहेत. हे सिग्नल काही वेळा बंद असतात. त्या वेळी येथे वाहतूक कोंडी होत असते.
पिंपरीतील शगुन ते साई चौक या अंतरात मोबाईल विक्रीची बाजारपेठ आहे. येथे मोबाईल खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. शगुन चौकातून साई चौकात जाणाऱ्या रस्त्यावर एका बाजुला दुचाकींची एकेरी पार्किंग करण्यास परवानगी आहे. तथापि, साई चौकातून शगुन चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर “नो पार्किंग’ करण्यात आले आहे. मात्र, ही “नो पार्किंग’ची शिस्त पाळली जात नसल्याचे चित्र सध्या पाहण्यास मिळत आहे. वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांच्याशी याबाबत भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. मात्र, ते उपलब्ध होऊ शकले नाही.