गोलंदाजीचे स्वातंत्र्य दिल्याने बळी मिळवण्यात यश
कोलकाता – कर्णधार विराट कोहलीने मला कायम पाठिंबा देत गोलंदाजी करण्याचे स्वातंत्र्य दिल्याने माझ्या गोलंदाजीत सुधारणा होवून मी बळी मिळवण्यात यशस्वी ठरलो असे विधान भारतीय संघाचा मुख्य फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने केले आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे गेले काही दिवस कुलदीप यादव चर्चेत आहे. मात्र, कुलदीपने आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची स्तुती केली असुन यावेळी पुढे बोलताना तो म्हणाला की, कोहली याने मला मैदानावर गोलंदाजी करताना स्वातंत्र्य दिले, त्यामुळेच मला यशस्वी होता आले. नुकताच कुलदीपला वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कर्णधाराने तुम्हाला कायम पाठिंबा द्यायला हवा. त्याने तुमच्यात असलेली प्रतिभा ओळखायला हवी आणि त्यानुसार कामगिरी करण्यासाठी गोलंदाजाला प्रेरणा द्यायला हवी. जर कर्णधाराने आम्हाला मैदानावर गोलंदाजी करताना स्वातंत्र्य दिले नाही, तर मात्र गोलंदाजाला यशस्वी होणे शक्य नाही, असेही कुलदीप यावेळी म्हणाला.
टी-20 क्रिकेट हे विश्वचषक स्पर्धेपेक्षा पूर्णपणे वेगळे असते. असे अनेक खेळाडू आहेत, जे टी-20 मध्ये चांगली कामगिरी करतात, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर फारसे चांगले काम करता येत नाहीत. मी गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळवले आहे. त्यामुळे आयपीएल अथवा टी20 मधील खराब कामगिरीचा माझ्या एकदिवसीय संघातील कामगिरीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कुलदीप म्हणाला.
टी 20 हा एक असा क्रिकेटचा प्रकार आहे, ज्या प्रकारात सामान्यतः फलंदाजांचे वर्चस्व असते. गोलंदाज एखाद्या दिवशी भयंकर महागडा ठरू शकतो. मी काही जादूगार नाही, त्यामुळे मलाही त्या दिवसाला सामोरे जावे लागले. मात्र, विश्वचषक स्पर्धेत मी किती बळी टिपू शकेन याबाबत मी आताच फारसे काही बोलू शकणार नाही, असेही कुलदीपने स्पष्ट केले.