म्हणाले प्रत्येक धर्मात त्यांच्या विचारांचे दहशतवादी असतात
कामराज सलाई: नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदु दहशतवादी होता असे विधान केल्यानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अभिनेते व राजकीय नेते कमल हसन यांनी आज आपल्या विधानात दुरूस्ती करून म्हटले आहे की प्रत्येक धर्मातच त्यांच्या विचारांचे दहशतवादी असतात. आज एका दूरचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की माझ्या विधानावरून मला धमकावण्यात येत आहे. मला अटक करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. मी अटकेला घाबरत नाही. मला अटक झाली तर मोठी तणावाची स्थिती निर्माण होईल.
ते म्हणाले की प्रत्येक धर्मातच दहशतवादी असतात. त्याची मोठी यादी आहे. इतिहासात त्याचे दाखले आहेत. कोणत्याही एका धर्माला मी त्यासाठी जबाबदार धरत नाही असेही त्यांनी यावेळी नमूद केले. कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला असून त्याद्वारे त्यांनी प्रथमच राजकारणात प्रवेश केला आहे. आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते ठिकठिकाणी रोड शो व सभाही करीत आहेत. ते म्हणाले की दगड किंवा चप्पल फेकीला मी घाबरत नाही. मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडत राहणार आहे. असे धमकाऊन मला कोणी गप्प करू शकत नाहीं.
महात्मा गांधी हे देशाचे महान सुपुत्र होते. त्यांची हत्या करण्याच्या प्रकाराच्या विरोधात मी माझे मत नोंदवले असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आपल्या विधानाबद्दल माफी मागण्यास त्यांनी नकार दिला. ते म्हणाले की आपण हिंदु आणि आरएसएस यांच्यात फरक केला पाहिजे. या निवडणुकीच्या काळात काही ठिकाणी त्यांना प्रचार करण्यास अनुमती नाकारण्यात आली होती त्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.