350 कुटुंबांचे स्थलांतर कधी?
इमारती पावसाळ्यामध्ये कोसळण्याची शक्यता
अहवाल अतिरीक्त आयुक्तांना सादर
तोडगा न निघाल्याने वर्षानुवर्षे प्रश्न तसाच
पुणे – महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची दुरवस्था झालेली असून याविषयी अनेकदा तक्रारीही करण्यात आलेल्या आहेत. परंतु, पावसाळापूर्व करावयाच्या कामांमध्ये या चाळींचे सर्वेक्षण करण्यात आले असून एका दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. महापालिकेच्या तीन वसाहतींच्या इमारतींमधील सदनिका राहण्यायोग्य नसून या इमारती पावसाळ्यामध्ये कोसळू शकतात, असा अहवाल अतिरीक्त आयुक्तांना सादर करण्यात आला आहे. या धोकादायक इमारतींमध्ये वास्तव्यास असलेल्या 350 कुटुंबांचे स्थलांतर करणे आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा वर्षानुवर्षांचा प्रश्न असून अद्याप त्यावर कोणताही तोडगा काढण्यात आला नाही.
महापालिकेच्या वतीने पावसाळ्यापूर्वी करावयाच्या आपत्कालीन कामांचे सर्वेक्षण सुरू आहे. धोकादायक वसाहतींचेही चाळ विभागाकडून सर्वेक्षण करून घेण्यात आले. वाकडेवाडी येथील संभाजीनगर, घोरपडे पेठ कॉलनी क्रमांक 8 व 9, साने गुरूजी नगर येथील अंबिल ओढा वसाहतीमधील इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. वाकडेवाडी येथील वसाहतीमध्ये एकूण नऊ इमारती आहेत. या इमारती तीन मजली असून याठिकाणी 288 सदनिकाधारक आहेत. या सर्व सदनिका राहण्यायोग्य नसल्याचे तसेच अत्यंत धोकादायक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय घोरपडे पेठेतील कॉलनी क्रमांक 8 मध्ये पाच आणि कॉलनी क्रमांक 9 मध्ये बारा अशा एकूण 17 इमारती आहेत. या सर्व इमारतींचे महापालिकेच्या मान्यताप्राप्त स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून ऑडीट करून घेणे आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच, साने गुरुजीनगर अंबिल ओढा वसाहतीमध्ये 11 इमारती असून दहा इमारती दोन मजली आहेत. तर एक इमारत तीन मजली आहे. याठिकाणी एकूण 455 सदनिकाधारक आहेत. यापैकी दहा क्रमांकाची इमारत अत्यंत धोकादायक असून येथील 24 सदनिकाधारकांचे पावसाळ्यापूर्वी त्वरीत स्थलांतर करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
स्लॅब धोकादायक स्थितीत
बऱ्याचशा सदनिकांच्या टॉयलेट्स आणि बाथरुममध्ये गळती होत असून भिंतींमधून उगवलेल्या वड, पिंपळाच्या झाडांमुळे भेगा पडल्या आहेत. तसेच, स्लॅब धोकादायक बनले आहेत. अनेकांच्या घरांमधील सिलिंगच्या प्लास्टरला तडे गेले असून स्लॅबचे स्टील उघड्यावर आले आहे. स्टीलला गंज चढल्याने ते कमकुवत बनले आहेत. काही इमारतींमधील पॅसेजमधील कुंबी पडायला आल्या आहेत. काही इमारतींमधील बीम आणि कॉलमही जीर्ण झाल्याने इमारतींचा सांगाडा कधीही पडू शकतो, अशी परिस्थितीत आहे. (आरसीसी स्ट्रक्चर) काही ठिकाणी पॅसेजला बाक आला असून त्याला तात्पुरता मलमपट्टी म्हणून आधार देण्यात आलेला आहे. अनेक ठिकाणी सज्जे तुटलेले आहेत. तर काही इमारती पुढील बाजूस झुकल्या आहेत. यासोबतच पाणीपुरवठा करणाऱ्या वाहिन्याही जीर्ण झाल्या आहेत. त्यामधून दुषित पाणीपुरवठा होत आहे. मैलापाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज लाईन्स आणि चेंबर्स घुशींनी पोखरल्याने माती साचून तुंबत आहेत, अशी परिस्थिती आहे.