जर आपले वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर आपल्याला आयटीआर विवरणपत्र दाखल करणे गरजेचे आहे. मात्र वार्षिक उत्पन्न यापेक्षा कमी असेल तरीही रिटर्न भरल्यास आपल्याला अनेक लाभ मिळू शकतात.
कर तज्ज्ञांनुसार अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न मिळवणारे नोकरदार किंवा लहान व्यापाऱ्यांना रिटर्न फाइल करणे फायद्याचे ठरू शकते. या आधारावर ते कर्ज मिळवू शकतात. त्याचवेळी नोकरदार मंडळी कंपनीकडून टीडीएस कपातीचा दावा करून ते रिफंड मिळवू शकतात. एक एप्रिलपासून आर्थिक वर्ष 2018-19 साठी प्राप्तीकर विवरण भरण्यास सुरवात झाली आहे. 31 जुलै ही प्राप्तिकर विवरण भरण्याची शेवटची तारीख असणार आहे.
कर्ज किंवा क्रेडिट कार्ड घेण्यासाठी उपयुक्त
घर किंवा मोटार खरेदीसाठी अर्ज केल्यास बॅंका आपल्याला फॉर्म 16 ची मागणी करतात किंवा दोन तीन वर्षातील प्राप्तीकर विवरणपत्र मागतात. जर आपण नियमितपणे प्राप्तीकर विवरण भरत असाल तर आपल्याला सहजपणे कर्ज मिळू शकते. जी मंडळी रिटर्न फाईल करत नाही, त्यांना कर्ज मिळण्यास अडचणी येतात. हीच बाब क्रेडिट कार्डला देखील लागू होऊ शकते. क्रेडिट कार्ड कंपन्या देखील रिटर्नला प्राधान्य देतात. रिटर्न असल्यास कार्ड लवकर इश्यू करतात.
प्राप्तिकर विवरण का भरायचे? (भाग-२)
टीडीएसचा पैसा मिळेल
जर आपण नोकरदार असाल आणि एखाद्या कंपनीने आपला टीडीएस कापला असेल तर रिटर्न फाइल करून आपण प्राप्तीकर खात्याकडून रिफंड मिळवू शकता. त्याचवेळी आपण व्यापारी असाल आणि टीडीएस कपात होत असेल तर टीडीएस रिफंडचा दावा करण्यासाठी प्राप्तिकर विवरणपत्र भरणे गरजेचे आहे.
– विश्वास सरदेशमुख