नवी दिल्ली – कॉंग्रेसला जारी करण्यात आलेल्या करवसुलीच्या नोटिसीनंतर पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आक्रमक भाषेत इशारा दिला. जेव्हा सरकार बदलेल; तेव्हा लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱ्यांवर निश्चित कारवाई होईल. त्या कारवाईमुळे पुन्हा असे करण्याचे धाडस कुणी करणार नाही. ती माझी गॅरंटी आहे, असे त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमधून म्हटले. त्या समवेत त्यांनी १५ मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेचाही व्हिडीओ शेअर केला. त्या पत्रकार परिषदेत राहुल यांनी कॉंग्रेसला धाडण्यात आलेल्या प्राप्तिकर नोटिसांसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे दिली.
कॉंंग्रेसला आयकर खात्याची तब्बल १८०० कोटी रूपये दंडाची नोटीस –
कॉंग्रेसवर चार वर्षापुर्वीच्या एका आयकर विवरण पत्रातील विसंगतीच्या प्रकरणात दोनशे कोटी रूपयांच्या जप्तीची कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांचे बँक खातेही गोठवण्यात आले आहे. त्याच्या विरोधात कॉंग्रेसला काल उच्च न्यायालयाकडूनही दिलासा मिळू शकला नाही. त्या पाठोपाठ आज दुसऱ्या दिवशी आयकर खात्याने कॉंग्रेसला दंड आणि व्याज मिळून तब्बल १८०० कोटी रूपयांच्या वसुलीची नवी नोटीस जारी करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना विरोधकांवर सरकारकडून सुरू असलेला हा कर दहशतवाद आहे असे कॉंग्रेसने म्हटले आहे. या नव्या नोटीशीला कोर्टात आव्हान दिले जाणार असल्याचे पक्षाचे खजिनदार अजय माखन यांनी सांगितले. ते म्हणाले की आमच्या पक्षाच्या २३ आमदार आणि खासदारांनी १४ लाख रूपयांचा निधी पुर्वी दिला होता.
ज्यांनी हा निधी दिला आहे त्यांची नावे आणि पत्तेही कॉंग्रसने आपल्या विवरण पत्रात सादर केली आहेत. पण त्यावरून आमच्यावर आयकर खात्याने बळजबरीने कारवाई केली आहे. पण भाजपच्या खात्यातील एका व्यवहारात पक्षाला अनेक लोकांनी एकूण ४२ कोटी रूपये देणगी दिल्याची नोंद आहे. पण त्यातील अनेकांची नावे आणि पत्तेही त्यांनी सादर केलेली नाहीत. याच आधारावर भाजपवरही अशीच कारवाई का केली गेली नाही असा सवाल अजय माकन यांना उपस्थित केला.
पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की कॉंग्रेसला आर्थिक दृष्ट्या विकलांग करून निवडणूक प्रचार रोखण्याचा प्रकार भाजप सरकारने केला असला तरी आम्ही त्यातून खचून किंवा दबून जाणार नाही. आम्ही आमचा प्रचार नेटाने करू आणि पक्षाच्यावतीने मतदारांना ज्या हमी देण्यात आल्या आहेत त्या आम्ही लोकांपर्यंत पोहचवू.
“मग भाजपलाही ४६०० कोटी रूपयांचा दंड झाला पाहिजे”
चौदा लाख रूपयांच्या उत्पन्नाबाबत आयकर विभागाने ज्या प्रमाणात कॉंग्रेसवर कोट्यवधी रूपयांचा दंड आकारला आहे. त्याच हिशेबाने भाजपच्या निनावी उत्पन्नासाठी ४६०० कोटी रूपयांचा दंड आकारला पाहिजे अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून आयकर विभाग दुटप्पीपणा करीत आहे असा आरोप कॉंग्रेसने केला आहे. पत्रकार परिषदेला संबोधित करताना, काँग्रेस नेते जयराम रमेश आणि अजय माकन म्हणाले की, आम्हाला सीताराम केसरींच्या काळातील व्यवहाराबद्दल नोटीसा आल्या आहेत.
हे व्यवहार १९९३-९४ च्या काळातील आहेत. आमच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की भाजपला ४२ कोटींची देणगी देणाऱ्या १२९७ देणगीदात्यांच्या नाव किंवा पत्त्याची नोंद नाही. त्यातील ९२ व्यक्ती अस्तित्वातच नाही. हेच मापदंड वापरले तर भाजपला ४६०० कोटी रूपयांचा दंड झाला पाहिजे. या खेरीज इलेक्टोरल बॉंड द्वारे भाजपने ८२०० कोटी रूपयांहून अधिकचे उत्पन्न मिळवले आहे त्याचा हिशब आयकर विभाग भाजपकडे मागणार आहे काय असा सवालही कॉंग्रसने उपस्थित केला आहे.