सोलापुरी द्राक्षांची हंगाम आणखी 15 दिवस
पुणे – मार्केट यार्डात गोड, आंबट चवीच्या द्राक्षांची होणारी आवक घटली आहे. पुणे आणि सांगली जिल्ह्यातील द्राक्षांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. तर, सोलापूर जिल्ह्यातील द्राक्षांचा हंगाम आणखी पंधरा ते वीस दिवस सुरू राहणार आहे.
दरवर्षी द्राक्षांचा हंगाम नोव्हेंबरच्या अखेरीस सुरू झाला होता. त्यावेळी द्राक्षांची आवक ही किरकोळ होती. तसेच द्राक्षांना तुलनेने गोडीही कमी होती. मात्र, जानेवारीच्या मध्यानंतर द्राक्षांची आवक मोठ्या प्रमाणात वाढत गेली. उन्हाचा कडाका वाढत गेल्याने गोडीही वाढली होती. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्षांची आवक आणि मागणी चांगली होती. मात्र, मध्यंतरी झालेल्या गारपिटीा द्राक्षांना काही प्रमाणात फटका बसला यंदा राज्यात सर्वत्रच तीव्र दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांना द्राक्षांच्या बागा जगविण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागले. यंदा द्राक्षांचा हंगाम ऐन बहरात आला असताना सर्वोच्च 100 टन एवढी आवक झाली होती. ही आवक महिनाभर सुरू होती.
याबाबत द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले, “सद्यस्थितीत माणिकचमण आणि सुपर सोनाका या द्राक्षांची मार्केटयार्डात आवक होत आहे. माणिकचमण द्राक्षांस पंधरा किलोस 700 ते 1000 रुपये आणि सुपर सोनाका या द्राक्षांस प्रतिपंधरा किलोसाठी 1000 ते 1300 रुपये भाव मिळत आहे. बाजारात येणाऱ्या मालाला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. तसेच द्राक्षांचा हंगाम यंदा चांगला झाला,’ असे ते म्हणाले. “यंदाच्या हंगामातील द्राक्ष उच्च प्रतिचे होते. त्यामुळे त्यांना चांगला भाव मिळाला. भावाबाबत शेतकरी समाधानी होते.’
दोन एकरामध्ये बाग लावली होती. पहिल्यांदाच या बागेतील माल विक्रीसाठी आणला होता. वातावरण पोषक असल्याने यावर्षी उत्पादन चांगले झाले. भावही चांगला असल्याने सात ते साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.
– हरिदास कदम, शेतकरी कवळे महांकाळ, जि. सांगली