डॉ. दीपक शिकारपूर
तेलाचे साठे सापडल्याने मध्यपूर्व देशांचा विकास झाला. भारताचे खरे भांडवल आहे आपली युवाशक्ती तीसुद्धा ग्रामीण भागातील. कारण 75 टक्के युवक ग्रामीण भागातच आहेत. शहरी भागातील झालेली (सूज आलेली) अनियंत्रित वाढ व गगनाला भिडणारे जमिनीचे दर हे चित्र लक्षात घेऊन अनेक आयटी, बीपीओ उद्योग द्वितीय स्तरावरील शहरांचा गांभीर्याने विचार करत आहेत. आजूबाजूच्या ग्रामीण युवकांना ही सुवर्णसंधी ठरू शकते. बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, व्यवहारज्ञान, माणुसकी ह्या कुठल्याही बाबीत ग्रामीण युवाशक्ती कमी नाही. गरज आहे ती वेग, नवकल्पना, मूल्यवर्धन आणि बदल आत्मसात करणे हे आजच्या घडीचे मंत्र अंगिकारण्याची.
जघडीला आपला भारत देश एका संक्रमणावस्थेतून जातो आहे. सध्या विविध आघाड्यांवरच्या प्रगतीचा किंवा विकासाचा वेग किंचित मंदावल्यासारखा दिसतो आहे खरा. मंदीचे ढग अजूनही क्षितिजावर रेंगाळत आहेत, ते पूर्णपणे दिसेनासे झालेले नाहीत. पण सगळेच चित्र निराशाजनक नक्कीच नाही. विकासाचा, वाढीचा, उत्पादनाचा वेग मंदावला आहे; परंतु थांबलेला नाही. ही अवस्था लवकरच जाईल. जगात अशा रीतीने चिरंतन किंवा शाश्वत काहीही नसते आणि म्हणूनच या मंदीचा जास्त बाऊ करू नये. कारण या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आणि देदीप्यमान यश मिळवण्यासाठी जी बाब खऱ्या अर्थाने आवश्यक आहे ती आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे – पैसा नव्हे तर विविध कौशल्ये आत्मसात केलेली माणसे ऊर्फ स्किल्ड मॅनपॉवर.
सन 2020 पर्यंत आपण एका विकसित देशाचे नागरिक असू हे नक्की आणि त्यातून आपण – एका वेगळ्या मार्गाने – जगावर राज्यही करू शकू. त्यासाठी लष्कर, राजकारण, पैसा ह्या गोष्टींची आवश्यकता नाही की नव्याने एखादी ईस्ट इंडिया कंपनी स्थापून मुलूख पादाक्रांत करण्याचीही गरज नाही. आपण एक आर्थिक महासत्ता होण्याचा प्रयत्न करू आणि या मोहिमेत आपले लढवय्ये असतील हे कुशल मोहरे. माझ्या दृष्टीने आयटी या शब्दप्रयोगाचा अर्थ आहे इंडियाज् टॅलेंट. तेलाचे साठे सापडल्याने मध्यपूर्व देशांचा विकास झाला.
भारताचे खरे भांडवल आहे आपली युवाशक्ती तीसुद्धा ग्रामीण भागातील. कारण अगदी साधे आहे. 75 टक्के युवक आहेत ग्रामीण भागातच. शहरी भागातील झालेली (सूज आलेली) अनियंत्रित वाढ व गगनाला भिडणारे जमिनीचे दर हे चित्र लक्षात घेऊन अनेक आय टी / बी पी ओ उद्योग द्वितीय स्तरावरील शहरांचा गांभीर्याने विचार करत आहेत. आजूबाजूच्या ग्रामीण युवकांना ही सुवर्णसंधी ठरू शकते. स्थानिक युवकांना रोजगार द्यायचे धोरण उद्योगक्षेत्र नक्कीच अवलंबेल. पण हे आरक्षणाच्या मार्फत मिळणार नसून कौशल्याच्या जोरावर मिळणार आहेत. बुद्धिमत्ता, आकलनशक्ती, व्यवहारज्ञान, माणुसकी या कुठल्याही बाबीत ग्रामीण युवाशक्ती कमी नाही. अनेक शहरी तरुण/तरुणांनी खरे तर या बाबी ग्रामीण मित्रांकडून शिकल्या पाहिजेत, ग्रामीण युवकांचे प्रश्न अगदी साधे आहेत. आत्मविश्वास, संभाषण कौशल्य, कार्यसंस्कृती, वेळ पाळणे व टापटीप या प्रमुख बाबींवर त्यांनी लक्ष दिले पाहिजे.
व्यक्तीसापेक्ष अंगभूत कौशल्यांचा विकास करण्याकडे आपण खरोखरीच युद्धपातळीवर लक्ष दिले तर भविष्यात आपला देश फार वेगळा दिसेल. मात्र, त्यासाठी सर्वांनाच शिक्षणाबाबतची आपली संपूर्ण विचारपद्धती पूर्णपणे बदलावी लागेल – आजच्या शिक्षणाने विद्यार्थी फक्त घोकंपट्टी आणि मार्काच्या चरकात पिळून निघत आहेत व पुस्तकातले किडे बनत आहेत. हे ताबडतोब थांबवून त्यांना ते विषय खरोखरी कितपत समजले आहेत हे तपासणे आवश्यक आहे. कारण नवीन प्रकारच्या व्यवस्थेमध्ये, इंटरनेटसारख्या माध्यमांतून जग जवळ आल्याने, बुद्धिमत्तेचे निकषच बदलू लागले आहेत. ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करता येण्यावर जास्त भर दिला जात आहे व येत्या काळात अनावश्यक माहितीच्या घोकंपट्टीला पूर्णपणे फाटा मिळणार आहे.
पुढील दशकामध्ये आपणां सर्वांच्या खासगी तसेच कामाच्या ठिकाणच्या जीवनशैलीत मोठे बदल होणार आहेत. विसाव्या शतकात जे नीतिनियम किंवा धोरणे लागू होती ती भविष्यकाळात कामास येणार नाहीत. त्यामुळे “अनुभवी’ असण्याची संकल्पनाच बदलणार आहे – म्हणजे असे एखादे काम प्रभावीपणे करून दाखवणाऱ्या व्यक्तीस, पारंपरिक अर्थाने, त्या कामासंबंधीचा खूप अनुभव असेलच असे नाही. व्यवहारज्ञान, प्रभावी संवाद साधण्याचे कौशल्य, समूहामध्ये काम करण्याची तयारी व क्षमता या व अशा बाबींना आजच्या तुलनेमध्ये असाधारण महत्त्व येणार आहे. दुर्दैवाने आज ह्या बाबींचे महत्त्व कोणालाही फारसे जाणवत नाही आणि त्यामुळे मुलामुलींना त्या शिकवल्या गेल्या पाहिजेत, असेही वाटत नाही.
संशोधन, विश्लेषण, सखोल अभ्यास यांना कमी लेखण्याचा हेतू इथे अजिबात नाही. परंतु एखाद्या व्यक्तीमध्ये असलेले गुण प्रभावीपणे प्रकट होऊ शकत नसतील तर ते योग्य नाही. या मुद्द्याच्या स्पष्टीकरणासाठी आपण अभ्यासातले नाही तर खेळाचे उदाहरण पाहू. विसाव्या शतकात ज्या पद्धतीने क्रिकेटचे सामने होत असत त्यापेक्षा आजच्या एकविसाव्या शतकातली पद्धत खूपच वेगळी आहे. बदलत्या जमान्यानुसार खेळाडूंकडून असलेल्या प्रेक्षकांच्या अपेक्षाही बदलल्या आहेत आणि ह्या बदलत्या अपेक्षांना अनुरूप पद्धतीने सामने खेळले जात आहेत. उच्चशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अशा तऱ्हेचे बदल होऊ घातले आहेत. वेग, नवकल्पना, मूल्यवर्धन आणि बदल आत्मसात करणे हे आजच्या घडीचे मंत्र आहेत.
संगणकचातुर्य संपादन करायची गुरूकिल्ली
- पव्यावसायिक इंग्रजी व आणखी एका परदेशी भाषेचे शिक्षण घेणे अनिवार्य. यासाठी इ शिक्षण, वेब, टीवी या माध्यमाचा वापर अनिवार्य आहे.
- पग्रामीण भागातील कुशल शिक्षकांची कमी संख्या लक्षात घेऊन तेथे व्हिडिओ व वेबवर आधारित सभा-संभाषणाची सोय.
- पपुस्तकी ज्ञानावर भर न देता आकलन व अंमलबजावणीवर जास्त भर.
- पशहरी भागातील कुशल प्रशिक्षकांना न नफा न तोटा या तत्त्वावर कौशल्य वृद्धीसाठी आमंत्रित करणे व विद्यार्थ्यांना या प्रशिक्षण वर्गांना सक्तीने बसवणे.
- पशिक्षणात फारशी गती नसलेल्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणे (बी पी ओ, संगणक मोबाइल देखभाल इ).
- पमहिलांना संगणक साक्षर करून शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे. बहुतेक सर्व आयटी कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. कोणत्याही आरक्षणाची मागणी न करताही आयटी आणि बीपीओच्या क्षेत्रात त्यांनी आघाडी मारली आहे.
- पआपल्या व्यवसायाचा भाग म्हणून उद्योगांनी शिक्षकांना प्रशिक्षण व विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट्स पुरवणे.
(लेखक संगणक उद्योजक, समुपदेशक आहेत.)