– शंकर ग. शिंदे
15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्याची पहाट उजाळली. ही पहाट अनुभवनाचा योग आलेले ज्येष्ठ शंकर शिंदे यांनी आपली ही आठवण सांगितली आहे. त्या काळी पुणे शहरात पहिला स्वातंत्र्य दिन साजरा झाला त्याचे साक्षिदार असलेले शिंदे आपल्याला त्या काळात घेऊन जातात. त्यांचा अनुभव वाचताना आपणही जणू स्वातंत्र्याचा पहिला ध्वज फडकताना पाहतो व आपला हात आपसुकच तिरंगा झेंड्याला मानवंदना देण्यासाठी कपाळाकडे जातो…
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा तो पहिला दिवस. भल्या पहाटेपासूनच भूपाळ्या, आरत्या, अजान, भजने, समरगीते याचे मंगलध्वनी सर्वत्र घूमत होते. लोकांनी तो दिवस दीपावलीच्या सणासारखा साजरा केला. पूणे शहरातसुद्धा स्वतंत्र्याचा तो प्रथम दिवस खूप आनंदात आणि उत्साहात साजरा होत होता. जणू आनंदाचा तो एक अमोल ठेवाच होय. त्या वेळी मी शुक्रवार पेठेतील पंचसचिवांचा वाडा घर क्र. 648 येथे राहत होतो. आणि जवळ पुणे म.न.पा. शाळा क्र. 26 मध्ये इयत्ता दुसरीत शिकत होतो.
15 ऑगस्ट 1947च्या दिवशी सकाळी 7 वाजता आम्ही सर्व शाळकरी मुले शाळेत जमा झालो होतो. आमचे हेडमास्तर खोले गुरूजींनी ध्वजारोहण केले. त्यांनीच आम्हा सर्वांना खाऊ दिला होता. एक गोलाकार बिल्ला दिला त्यावर जयहिंद व भारताचा नकाशा कोरला होता. आम्हा मुलांनी तो शर्टवर लावून प्रभात फेरीमध्ये भाग घेतला. खूप अभिमान वाटला आम्हाला. जणू आम्ही छोटे सैनिकच आहोत.
पुणे शहरातील पर्वती, शनिवार वाडा, विश्रामबाग वाडा येथून सनईचौघड्यांचे मंगलध्वनी सर्वत्र निनादत होते. विश्रामबाग वाड्यामधून त्यावेळी पुणे शहराचा कारभार चालत असे. जुनी मुन्सिपालटी त्याच ठिकाणी भरत असे. तेथील कर्मचाऱ्यांनी देखिल बाबुराव सणस यांच्या हस्ते तेथे झेंडावंदन केले.
मंडईमधिल व्यापाऱ्यांनी फळाफुलांच्या माळा बांधून आपली दुकाने सजवली होती. तर भांडी बाजारातील व्यापाऱ्यांनी तांब्या-पितळांच्या भांड्यांची तोरणे बांधून आपल्या दुकानांची सजावट केली होती. पुणे शहरातील सर्व घरांवर आणि दुकानांसह तिरंगे ध्वज फडकवताना खूपच छान दिसत होते. घराघरांमध्ये गोडाधोडाचे जेवन बनत होते. सर्वत्र आनंदीआनंद चोहूकडे असेच वातावरण निर्माण झाले होते. नजरेत भरत होते.
संध्याकाळी सातनंतर व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांवर रंगीबेरंगी लाइटच्या माळा लावल्या होत्या तर सर्वसामान्य जनांनी आपल्या घराभोवती रांगोळ्या व पणत्या लावून वातावरणाची शोभा वाढवली होती. शहरातील मान्यवर नेत्यांनी बापूजींच्या प्रतिमेसमोर चरख्याच्या व टकळीच्या साह्याने सुतकताई करून स्वातंत्र्य दिनाचे स्वागत केले होते. त्यात केशवराव जेधे, बाबुराव सणस, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी नाईक निंबाळकर इत्यादी नेत्यांनी सहभाग घेतला होता.
असा हा स्वातंत्र्य दिनाचा पुणे शहरातील पहिला दिवस आमच्या पिढीला पहायला मिळाला. त्या सुंदर क्षणांचे आम्ही साक्षिदार असल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. तसेच 15 ऑगस्ट 2021 हा स्वातंत्र्य दिनाचा 75 वा वाढदिवस अमृत महोत्सवी वर्षे म्हणून साजरा होत आहे. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.