बऱ्याच ठिकाणी बदली होत होत शेवटी आम्ही पुण्यात स्थायिक व्हायचे ठरवले आणि एका नवीन सुसज्ज बिल्डिंगमध्ये घर घेतले. घर मोठे, आणि आधुनिक सोयींनी सुसज्ज होते; पण घरात आम्ही दोनच माणसे आणि मजल्यावर दोनच फ्लॅट. मी शेजारी कोण राहायला येणार याची वाटच पाहत होते आणि एके दिवशी एक तरुण जोडपे आणि त्यांची मुलगी दिसली.
मी थोडी नाराज झाले. आता यांच्याशी आपले कसे जुळणार, कारण हे तर दोघे आयटीवाले दिसतात. म्हणजे दिवसभर बाहेर असणार आणि मुलगीपण शाळा आणि पाळणाघरात. पण मार्चमध्ये अचानक करोना आला आणि सारे जणू ठप्प झाले. काही दिवस घराबाहेरही पडलो नाही. मग एकदा लिफ्टमध्ये आमची भेट झाली त्या छोटीशी.
हसलो बघून आणि मग हळूहळू आमचं जमू लागलं. तरूण जोडपे समंजस आणि मदत करणारे होते. मग कधी काही पदार्थांची देवाणघेवाण सुरू झाली. तर कधी समोर पॅसेजमधून बसून गप्पा सुरू झाल्या. मग ती कलिका घरीही येऊ लागली. आई बाबा लॅपटॉपवर असत. हिची शाळाही नव्हती. कंटाळून जायची. एकदा तिचे आई बाबा म्हणाले, चालेल का तुमच्याकडे थोडा वेळ आली तर. मग कलिका मी आणि हे आमचं त्रिकूटच जमलं. ती तिचं ताट घेऊन यायची, मग आमच्या कडचा गरम वरणभात आवडीने खायची.
करोनाने सगळे घरात आणि बाहेर जायला बंदी. एके दिवशी मी माझे कपाट आवरताना मला माझ्या मैत्रिणींची जुनी पत्रे सापडली आणि आवरण बाजूला ठेवून मी वाचतच बसले. कलिका आली तरी मी दिसेना. काका तिला म्हणाले, “आज बहुतेक जेवणाला सुट्टी दिसते. तुझी काकू वाचत बसलीय.’ कलिका आत आली तरी मी गुंगच होते. तिला कळेना ही काय वाचते आहे. तिला पुस्तकही दिसेना नेहमीप्रमाणे.
कलिका म्हणाली, “तू काय वाचते आहेस?’ मी म्हणाले, “माझ्या मैत्रिणींची, भावाबहिणी, नणंदा, दीर यांची पत्रं.’ तिचा खूपच गोंधळ उडाला. मग मी तिला आधी सारी नाती समजून सांगितली. मग सांगितले की, “आम्ही काकांच्या नोकरीमुळे कधी काश्मीर, डेहराडून, मसुरी, दिल्ली आणिक ही किती ठिकाणी राहिलो. तेव्हा फोन ही लॅंडलाइन असायचा. तो कधीतरी करता येत असे. मग हे माझे आणि काकांचे नातेवाईक अशी पत्रं पाठवित असत.
आता तुम्ही जे फोनवरून बोलता ना ते लिहावे लागे पत्रावर. ही पत्रे पोस्टात मिळतात आणि लिहून झाल्यावर तिथेच लाल पेटीत टाकायची असतात. त्यावर पत्ता म्हणजे अँड्रेस लिहायचा. आता कसा ई मेलचा अँड्रेस असतो तसा राहण्याचापण असतो.
या निळ्या पत्राला आंतरदेशीय म्हणतात. हे पिवळे आहे ना त्याला पोस्ट कार्ड म्हणतात. वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला, खुशाली सांगायला, काही चांगली अथवा दुःखद घटना ही पत्राने कळवत असत. आणि बरका कलिका, पत्र लिहिणे हीसुद्धा एक कला आहे. त्याला एक विशिष्ट पद्धत, रित असते. बघ बरं वरती श्री लिहिले आहे. मग कुणाला लिहायचे त्याचे नाव, मग नमस्कार. मजकूर लिहून झाला की घरातील इतरांनाही वयाप्रमाणे नमस्कार किंवा आशीर्वाद. ता. क. म्हणजे ताजा कलम… म्हणजे लिहून झाले की आठवलेले महत्त्वाचे. आणि शेवटी पुन्हा
आपला, म्हणून छानशी सही. अगं आम्हाला शाळेत पत्र लिहायला शिकवत. पेपरमधेसुद्धा एक प्रश्न असे. असा हा पत्रप्रपंच. आता हे सर्व खूप मागे गेले. पण त्या त्या वेळी आपल्या प्रियजनांच्या पत्राची खूप आतुरतेने वाट पाहिली जायची.’ कलिका ऐकत होती मग म्हणाली, “ए, मी लिहू तुला पत्र…’ “हो चालेल की.’ तेवढ्यात बाहेरून हे म्हणाले, “काय आज जेवण आहे की नाही… का पत्र पाठवू…’
माझा पत्रप्रपंच मी आटोपून माझ्या प्रपंचातील भूमिकेत शिरले. जेवताना हे म्हणाले, “या साऱ्या जुन्या गोष्टी मुलांना कळायला हव्यातच. सांगणारं कुणीतरी पाहिजे. नाही का.’
कलिका हसत होती.
आरती मोने