– उदय देवळाणकर
भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना करोना महामारीमुळे आज सबंध जग एका विचित्र अवस्थेत सापडले आहे. सर्व यंत्रणा, आरोग्यव्यवस्था, बाजारपेठ, मूल्यप्रणाली, शिक्षणव्यवस्था, व्यवस्थापन, कायदा सुव्यवस्था आणि एकूणच सृष्टीवर अधिराज्य गाजवण्याचं आपलं मोठेपण हे सारं धोक्यात आलं आहे. आजवर मानवाला या सर्वांवर नियंत्रण मिळवल्याचा अभिमान होता. पण आज करोनानं या समजाला छेद दिला आहे.
वास्तविक, अतिप्राचीन काळात डायनासोरपासून मॅमॉथपर्यंत अनेक प्रजातींनी अशा अनेक विषाणूंचा सामना केला. त्यांचंही नष्टचर्य आलं. मानवानंही आजवर अनेक संकटांना तोंड दिलं. पण अनेक पशू-पक्ष्यांना जशी आगामी संकटाची चाहूल लागते तशी मानवाला या संकटाची किंवा त्याच्या भयावहतेची चाहूल लागली नाही. असे का झाले? आज जगाची जी अवस्था होऊन बसली आहे त्याचं मूळ कशात आहे?
जगाच्या सुरुवातीला म्हणजे मानवी संस्कृतीचा विकास सुरू झाल्यानंतर जगात दोन प्रकारच्या प्रमुख विचारांनी आणि संस्कृतींनी जन्म घेतला. एक होती उत्पादकांची संस्कृती. सामाजिक कौशल्य, सामाजिक सद्भावना, सामाजिक कामांचं वाटप, त्यातून आयुष्याची प्रत किंवा गुणवत्ता वाढवतील अशा पदार्थांचं उत्पादन यातून भारतीय संस्कृतीचा विकास होत गेला. युरोपिय देशांमध्ये शेतीचा हंगाम पाच-सहा महिन्यांचा असतो.
विषुववृत्तीय वातावरण असलेल्या भागात रेनफॉरेस्ट आहेत आणि तिथे दररोज पाऊस पडतो. त्यामुळे तेथे नियंत्रणातील शेती करणे शक्य होत नाही. अन्य ठिकाणी वाळवंटीय प्रदेशात पर्जन्यमान अत्यंत कमी असल्याने सलग शेती करणे शक्य नव्हते, त्यामुळे तेथे मानवी संस्कृतीचा विकास करणे शक्य नव्हते. युरोपातही सहा महिने बर्फ पडलेला असल्याने तिथे अन्न प्रिझर्व्ह करून टिकवलेले असायचे; पण त्याला एक प्रकारचा वास यायचा. त्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करण्याचे काम भारतीय मसाल्यांनी केले.
भारतातून जो व्यापार सुरू झाला त्यातून लवंग, दालचिनी, तमालपत्र, लसूण, कांदा, आले हे भारतीय पदार्थ तेथे जाऊ लागले. यामुळे तेथील नागरिकांच्या आयुष्यालाही एक रुची आली. कापडाचा शोधही भारताने लावला. जुन्या जगामध्ये आपल्या खेड्यांमध्ये बारा बलुतेदार आणि 18 कारखाने अशी व्यवस्था होती. त्यातून तयार झालेल्या उत्पादनांचे वहन करून राजस्थानात नेले जायचे. तेथे शेती कमी असल्याने भारतातून जाणाऱ्या या मालाची वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये विभागणी, साठवणूक व्हायची. तिथून मग बंजारा, बलुचांच्या टोळ्या हा माल अटकेपार घेऊन जायच्या. वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने हा माल जायचा.
याखेरीज नालासोपाऱ्यापासून जॉर्डनपर्यंत जहाजाद्वारे हा माल वाहून नेला जात असे. या सर्व मालाचे देयक देण्यासाठी चलन म्हणून सोन्या-चांदीच्या मुद्रा दिल्या जायच्या. त्यातून भारताचे सुवर्णवैभव वाढत गेले. या गोष्टी जर भारताकडून जगाने शिकल्या असत्या तर एक प्रकारचा समतोल कायम राहिला असता. भारतामध्ये कृषीसंस्कृतीचा, विचारांचा विकास होत असताना अशा प्रकारची शेती करता येईल असे कौशल्य जगाला सापडले नाही.
त्याऐवजी संघटित टोळ्यांकडून जिथे खाण्याचे पदार्थ आहेत, वस्र आहे, जडजवाहिरे आहेत ते लुटण्याची पद्धत सुरू झाली. भारतातून जो माल जायचा त्याची युरोपियन देशांना मोठी गरज होती. सहाव्या शतकामध्ये ग्रेट पर्शियन वॉर झाले. या युद्धात मुस्लीम जग आणि ख्रिश्चन जग यांच्यात फार मोठा संघर्ष झाला. हा संघर्ष सहा-सातशे वर्षे चालला. अनेक कारणांनी अखेरीस हे युद्ध लयाला गेले. परंतु या संघर्षामुळे भारताचा सोमालियापर्यंतचा जो व्यापार होता तो बाधित झाला. आपल्या पदार्थांना बाजारपेठा मिळवणे अवघड जाऊ लागले.
वास्तविक या व्यापारामध्ये संपूर्ण भारतीय लोक, समाज आणि गावखेड्यांमधील लोक सामावलेले होते. त्याकाळी आपण मोठी शहरे वसवलेली नव्हती. वेगवेगळ्या वस्त्यांतून हे पदार्थ एकत्रित व्हायचे आणि निसर्गदत्त न्यायाने हा व्यापार सुरू होता, शेती सुरू होती. पण हे व्यापारी मार्ग खुंटल्यानंतर आपल्याकडील पैसा लुटण्यासाठी संघटित हल्ले सुरू झाले आणि आपली समृद्धीही कमी होत गेली. यादरम्यान मोघलांचे आक्रमण झाले. इंग्लंडच्या राणीने, पोर्तुगीज शासकांनी, स्पेन शासकांनी समुद्रामार्गे भारतात येण्यासाठी मोहिमा आखल्या.
कारण इथल्या मालाची त्यांना गरज होती. यातील अनेक मोहिमा अपयशी ठरल्या. काही मोहिमा भरकटल्या. त्यातून 1492 मध्ये कोलंबसला नवीन जगाचा शोध लागला. त्यानंतर साधारण 33 वर्षांनी वास्को दी गामा भारतात आला. तोपर्यंत भारतातील सर्व व्यापारप्रणाल्या कोलमडल्या होत्या. मात्र तरीही आपल्याकडील खेडी स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी होती. इंग्रजांनी आपल्या वांशिक अस्मिता, धार्मिक अस्मिता, भौगोलिक अस्मिता, वर्णवर्चस्व, जातीय तेढ, धार्मिक तेढ आदींना पद्धतशीरपणे खतपाणी घातले. आपल्या मूल्यव्यवस्थेवर घाला घातला.
त्याचबरोबर इंग्रजांनी इथे सुनियोजितपणे बाजारपेठांची निर्मिती केली. यामागे त्यांचा डाव असा होता की, या बाजारपेठांमध्ये भारतीय उत्पादकांकडून अत्यंत स्वस्त दरात शेतमाल किंवा अन्य उत्पादने विकत घ्यायची आणि हा कच्चा माल विदेशात पाठवून तेथे त्यांच्या भांडवलातून तयार झालेला पक्का माल भारतीयांवर लादायचा.
या इंग्लिश नीतीतून मोठ्या शहरांची निर्मिती झाली. महात्मा गांधींनी म्हणूनच विदेशी वस्तूंचा बहिष्कार करण्याचे धोरण अवलंबले होते. आपल्या कष्टातून उत्पादित झालेले सामान आपण वापरायचे असा गांधीजींचा आग्रह होता. इंग्रजांची करपद्धती नाकारणे आणि भारतीय उत्पादन प्रक्रियेवर त्यांनी केलेले आक्रमण झुगारणे अशा दोन मार्गांनी आपण ब्रिटिशांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
ब्रिटिशांनी अनेक देशांवर राज्य केले. पण जगभरात राजवटी करताना शोषणावर आधारित व्यवस्था निर्माण केली गेली. त्यातून मोठ्या शहरांची निर्मिती झाली. अनैसर्गिक पद्धतीने माल, पैसा, पदार्थ यांचे केंद्रीकरण सुरू झाले. संचय केलेल्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी त्यांना क्षमता वाढवावी लागली. यातून मेकॅनिकल इंजिनिअरींगचे युग आले. तसेच कामगारांची चणचण भासू लागली. ती दूर करण्यासाठी शेतीवर दबाव आणण्यात आला.
गावागावातील उद्योग बुडवून त्यांना शहरांकडे पलायन करण्यास भाग पाडले. यातून ब्रिटिशांना स्वस्तात कामगार मिळू लागले. याविरोधात युरोपात क्रांती झाली. कामगारांच्या शोषणातून भांडवलाची निर्मिती होते, या तत्त्वज्ञानातून कार्ल मार्क्सने “दास कॅपिटल’ नावाचा ग्रंथ लिहिला. याद्वारे हंगेरीपासून रशियापर्यंत, पूर्व जर्मनी, चीन, व्हिएतनाम यांसारखे देशही उभे राहिले. पण नंतरच्या कालखंडात भांडवली देशातील कामगार मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय गटात परिवर्तित झाले. त्यांची समृद्धी होत गेली तसतसे वेगवेगळे स्टॉक एक्सचेंज उभे राहिले.
अनेक भांडवलदारांनी यामध्ये पैसा ओतला. हा पैसा कोठून आला? तर आशियन, आफ्रिक, लॅटिन अमेरिकन या देशांतील कृषीव्यवस्थेच्या दोहनातून आला. विशेष म्हणजे, हे शोषण करताना आपण त्यांच्या समोर राहिलो तर ते हल्ला करतील या भीतीने अदृश्यपद्धतीने नीतीधोरणे आखली गेली. यातूनच एका मोठ्या भांडवलशाही व्यवस्थेचा उदय झाला आणि तो यशस्वी झाला.
पण याच व्यवस्थेमुळे अतिश्रीमंत आणि अतिगरीब व्यक्तींचा समावेश असलेली जास्त घनतेची शहरे आकाराला आली. या शहरांमध्ये ज्यांच्याकडे प्रचंड उत्पादनाचे कौशल्य होते, ते न टिकल्याने गरीब बनलेले लोक अकुशल काम करू लागले. ज्याचे वडील कधी एकेकाळी उत्कृष्ट सुतार होते, चाके बनवायचे त्यांची नातवंडे या शहरांत वीटा उचलण्याचे काम करताना दिसू लागली.
वास्तविक, आपल्याकडे कृषककौशल्य आठ-दहा हजार वर्षांपूर्वीपासूनचे आहे. रामायणातील राम आणि सीता हे परस्पर पूरक का होते, कारण जनककन्या सीतेला वनाचे पूर्ण ज्ञान होते. कुठल्याही झाडाला त्याचा जीव न घेता त्यापासून अन्न कसे मिळवायचे याचे कौशल्य सीतेकडे होते. कंदमुळांपासून सर्वांचे ज्ञान सीतेला अवगत होते. सीतेच्या या कृषककौशल्याविषयी रामानेही कृतज्ञताभाव व्यक्त केला होता.
सीता हा शब्दच मुळात नांगराशी संबंधित आहे. पण आपल्या संस्कृतीच्या या सर्व धारणांवरच घाला घालण्यात आला. सुरुवातीला हा हल्ला केवळ भारतावर असल्याचे बोलले गेले; पण आज करोनाच्या संकटाने हे लक्षात आले आहे की हा सबंध मानवजातीचाच पराभव आहे. मानवी अव्यवस्थापनाचे हे प्रतीक आहे. आज मुंबई, बॅंकॉक, न्यूयॉर्क, लंडन, पॅरिस, सॅनफ्रासिस्को, जास्त घनतेच्या झगमगीत महानगरांमध्ये काय दिसते? जुगाराचे अड्डे, प्रचंड प्रमाणात येणारा काळा पैसा यांची सद्दी दिसते. ज्याला-ज्याला आपण असांस्कृतिक गोष्टी म्हणतो त्यांना इकॉनॉमीच्या खाली इथे संरक्षण दिलेले दिसते.
इथे उधळण्यात येणारा प्रचंड प्रमाणातील पैसा हा पृथ्वीचे दोहन करून, कष्टकऱ्यांचे शोषण करूनच आलेला असतो. या भांडवलाची हाव प्रचंड असल्याने आपण एका दलदलीत फसत चाललो आहोत. करोनाच्या महामारीनंतर हे उजागर झाले आहे. आधुनिक जीवनशैलीला पोसण्यासाठी उभारलेले बंदिस्त मॉल, विमानतळे आदी ठिकाणचे डक्ट एसी आज आपले शत्रू झाले आहेत. इथल्या एस्केलेटर्सवर हात ठेवण्याची हिंमत होत नाहीये. याचाच अर्थ आपण यश म्हणून जे जे उभे केले तेच आज आपला पराभव करण्यासाठी उभे ठाकले आहे. एका छोट्या विषाणूच्या भीतीने आज विमानतळावर जाण्यास लोक घाबरत आहेत. मग आपण मिळवलं काय?
याउलट आज जुन्या पद्धतीप्रमाणे रचना असती, आपल्याकडील लोकांना खेड्यात काम असते तर आजच्या इतकी भयानक परिस्थिती झाली नसती. जपानच्या नागासाकी आणि हिरोशिमावर जेव्हा अणुबॉम्ब टाकण्यात आले त्यानंतर काही क्षणात जपानच्या सम्राटाने केलेले भाषण ही मानवजातीसाठीची एक प्रकारे गीताच म्हणावी लागेल. सम्राटाने असे कबूल केले की, अतिरेकी पिपासू वृत्ती आमच्यात जोपासली गेली त्याचा परिणाम म्हणून हा केवळ जपानवरच बॉम्ब पडलेला नसून ते मानवाचे नष्टचर्य आहे. इथून पुढे जपान हा निःशस्र देश असेल.
आम्ही शांततेच्या मार्गाने जाऊ. त्याच वेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील दरांपेक्षा देशांतर्गत तांदळाचे दर तिप्पट करून टाकले. त्यातून जपानमधील झोपडी-झोपडीत पैसा गेला. त्या बचतीतून जपानमध्ये छोटेछोटे उद्योग उभे राहिले आणि आज जपान मोठ्या उद्योगांचा देश आहे. कोल्हापुरात, पंजाबमध्येही आपण हे पाहिले आहे. शेतीत बचत झाल्यानंतर ही केवळ ग्राम्यसंस्कृती न राहता तेथील क्रयशक्ती वाढते.
गावागावात उद्योग निर्माण झाल्यास मालवाहतुकीची समस्या, त्यातून होणारे प्रदूषण, शहरीकरण आणि पर्यायाने करोनाकाळातील हवालदिल बनवणारे प्रश्न या सर्वांतून सुटका होऊ शकेल. सद्यस्थितीत मानवी समाजाने शांतपणाने आजही आपल्या धोरणांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. गावाखेड्यांमध्ये कृषीउत्पादनावर तिथेच प्रक्रिया करण्यास प्राधान्य द्यायला हवे. भांडवलाचा हव्यास कमी करायला हवा. तसे झाले तर आपल्या मातीमध्ये, माणसामध्ये आणि शेतीमध्ये इतकी क्षमता आहे की अशा समस्यांना निश्चित उत्तर मिळू शकेल.