नवी दिल्ली – रालोआचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदींना पूर्ण विश्वास आहे. याच विश्वासासह मोदींनी पंतप्रधान कार्यालय, नीति आयोग आणि मुख्य वैज्ञानिक सल्लागारांना सत्तेत आल्यानंतरच्या पहिल्या 100 दिवसांचा कामकाज आराखडा तयार करण्याचा निर्देश दिला आहे. यात पुढील 5 वर्षांमध्ये जीडीपी दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचविण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे.
मोदींनी तीन महत्त्वाच्या विभागांना यापूर्वीच 100 दिवसांचा आराखडा तयार करण्याचा निर्देश दिला आहे. पीएमओ, नीती आयोगाचे उपाध्यक्ष आणि मुख्य वैज्ञानिक सल्लागारांना स्वच्छ भारत मोहिमेसह व्यापक आर्थिक तसेच नोकरशाही सुधारणांचा कार्यक्रम तयार करण्याचे काम मोदींनी सोपविले आहे. 100 दिवसांच्या अजेंडय़ात खनिज, तेल आणि वायू, पायाभूत सुविधा तसेच शिक्षणाच्या क्षेत्रात लक्ष केंद्रीत करण्याची सूचना पंतप्रधानांनी केली आहे.
2047 पर्यंत भारताला विकसित देशाच्या श्रेणीत सामील करण्याचे उद्दिष्ट मोदींनी बाळगले आहे. काही क्षेत्रांमध्ये विशेष लक्ष देऊन जीडीपी 2.5 टक्क्यापर्यंत सहजपणे वाढविता येऊ शकतो. 100 दिवसांच्या अजेंड्यामध्ये आर्थिक विकास आणि रोजगाराच्या क्षेत्रावर अधिक भर देण्याची सूचना करण्यात आली आहे.