औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरून नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला रामराम केला होता. सुभाष झांबड यांना काँग्रेसने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचं सांगत त्यांनी बंड पुकारल होतं. लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभं राहणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलं होतं. पण आता अब्दुल सत्तार यांचं बंड शांत झालं असून त्यांनी आपला अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज देखील मागे घेतला आहे.
ते पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करून काँग्रेसला मदत करणार की काँग्रेसविरोधी उमेदवाराला पाठींबा देणार ? यासंदर्भात येत्या सात दिवसात निर्णय घेणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितल आहे.
अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला असल्याने काँग्रेससाठी हा मोठा दिलासा असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी बदलण्यासाठी प्रचंड उठाठेव केली. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या भेटी घेतल्या.औरंगाबादेत जाहीर सभा घेतली. त्यासाठी त्यांनी दाबवतंत्राचाही पुरेपूर वापर केला. मात्र उमेदवारीत काही बदल झाला नाही. बुधवारी (3 एप्रिल) अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी दाखल केला होता. त्यामुळे काँग्रेससमोरच आव्हान वाढलं होतं.