पुणे – सत्याची साथ दिल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचलो आहे. संघर्षातून पळ काढणे हा माझा स्वभाव नाही. अनेक व्यक्ती आभासी जगामध्ये जगत असतात, मात्र त्यांना कधी ना कधी सत्याचा सामना करावाच लागतो, असे मत राहुल गांधी यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
हडपसर येथे आयोजित कार्यक्रमात अभिनेते आणि सूत्रसंचालक सुबोध भावे यांनी राहुल गांधी यांच्यावर सोशल मीडियामध्ये होणाऱ्या टीकेविषयी प्रश्न विचारले. व्यक्तीला सत्य परिस्थिती जाणीव नसते. तो आभासी जगामध्ये जगत असतो. मात्र, त्याकडे मी लक्ष देत नाही. आजपर्यंतच्या अनुभवातून मी कणखर झालो आहे, जे सत्य आहे ते स्विकारले आहे. सत्यातून हिंमत येते. जर खोटे स्विकारले तर भीती निर्माण होते. सत्य कधी कधी कडवे असते, परंतु ते स्वीकारावे लागते, असे उत्तर राहुल गांधी यांनी दिले.
आज मी जेथे उभा आहे, तेथे पंतप्रधानांनी उभे राहायला हवे की नाही? त्यांनी तुमच्या प्रश्नांना सामोरे जायला हवे की नको? पण ते तसे करणार नाहीत, कारण त्यांना प्रश्न नको आहेत, असा टोला राहुल यांनी लगावला. एका विद्यार्थ्याने “लग्न’ विषयावर वैयक्तिक प्रश्न विचारला परंतु या विषयाला त्यांनी थेट बगल न देता, “माझे लग्न माझ्या कामाशी झाले आहे.’ असे मार्मिक उत्तर दिले. त्यामुळे सभागृहात हशा पिकला आणि टाळ्याही पडल्या. तसेच, प्रियांका गांधी ही माझी सर्वात जवळची मैत्रीण असल्याचे त्यांनी नमूद केले.