Election Commissioner | Anandacha Shidha | Lok Sabha Election 2024 – राज्यात लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेमुळे स्वस्त धान्य दुकानामार्फत वाटप होणाऱ्या आनंदाच्या शिधावर विरजण पडले आहे. आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी १.५८ कोटी लाभार्थ्यांसाठीचा आनंदाचा शिधा वाटप थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
शिधा वाटपाबद्दल शासनाकडे मार्गदर्शन मागविल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे आता निवडणुक आयोगाच्या निर्णयाकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
शासनाकडून सण, उत्सवाच्या काळात राज्यातील स्वस्त धान्य दुकानामार्फत पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये एक किलो तेल, एक किलो साखर, अर्धा किलो चनाडाळ, अर्धा किलो मैदा,
अर्धा किलो रवा आदि जिन्नसाचा समावेश आहे. या जिन्नसाचा एकत्रित पाकीट तयार करून आनंदाचा शिधा वाटप केला जात आहे. १०० रुपयांमध्ये आनंदाचा शिधा दिला जात आहे.
दरम्यान, राज्य शासनाने शिवाजी महाराज जयंती तसेच श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा यानिमित्त आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व रास्त भाव दुकानदारांकडे शिधा पोहचविण्यात आला असून अद्यापही काही ठिकाणी शिधा वाटप सुरुच आहे.
त्यानंतर आगामी काळात गुढी पाडवा व इतर सण येणार आहेत. त्यावेळी आनंदाचा शिधा वाटपाचा निर्णय शासनाने जाहिर केला आहे. राज्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील लाभार्थ्यांना 10 किलो क्षमता असलेली बॅग वितरीत केली जाणार होती.
त्यानुसार सदर बॅग वाटपाला मनाई करण्यात आली आहे. तसेच मोफत साडी वाटपाचाही मनाई करण्यात आल्याचे पुरवठा विभागाच्या सुत्रांनी सांंगितले.