इंदापूर, (प्रतिनिधी) – महायुतीतील आपल्याच मित्र पक्षाचेच काही पदाधिकारी अतिशय खालच्या पातळीवर एकेरी शिवराळ भाषेत, बेताल वक्तव्य करत आहेत. तसेच तालुक्यात फिरू न देण्याची भाषा करीत आहेत.
त्यामुळे मला माझ्या सुरक्षिततेची चिंता वाटते असे खरमरीत निवेदन भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याने, बारामती लोकसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे.
गुंड प्रवृत्तीचे लोक माझ्या बाबतीत अशी भाषा वापरतात. त्यांना वेळीच आळा घाला अशी ही कैपयत या पत्रामध्ये नमूद केलेली आहे. त्यामुळे ज्यांनी हर्षवर्धन पाटलांवर फिरू न देण्याची भाषा केली. त्यांच्यावर ठोस कारवाई होणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
तर भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती असताना लोकसभा निवडणुकी आधीच इंदापूर तालुक्यात धमाका निर्माण झाला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी दिलेल्या पत्रावर काय कारवाई होणार, या कारवाईत कोण सापडणार. याच पत्रामुळे इंदापूर तालुक्यात युती धर्माचे काय होणार ? याकडे लक्ष लागले आहे.