हडपसर – सध्या राज्यातील राजकारणात काय सुरु आहे हे सगळं आपण पाहत आहोत. गुन्हेगारी वाढत आहे. काही दिवसांपूर्वी आपण महाराष्ट्राचा बिहार होत चालला आहे, असं म्हणत होतो. मात्र आता महाराष्ट्र बिहारच्या पुढे गेला म्हणायची वेळ आली आहे. राज्यात घडत असलेल्या घटना, राजकारण्यांची टीका, एकमेकांवर ओढण्यात येणारे ताशेरे पाहून देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री गप्प आहे.
खरंतर देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री झाल्यावर त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. चुकीच्या गोष्टींवर गृहमंत्री म्हणून ते काहीतरी ठोस कारवाई करतील, अशी माझी अपेक्षा होती, मात्र तसं घडताना दिसत नसल्याचंही खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या नवीन नावासह आज पक्षाचा शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि हडपसर विधानसभा मतदारसंघासाठीचा ‘विजय निश्चय मेळावा’ हडपसर येथील नेताजी हॉलमध्ये संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, हडपसर मतदार संघाचे अध्यक्ष प्रविण तुपे, माजी आमदार जयदेव गायकवाड ,प्रकाश म्हस्के, माजी उपमहापौर निलेश मगर, किशोर कांबळे, मृणालिनी वाणी, विकास लवांडे,निवृत्ती बांदल,विक्रम शेवाळे,राहुल घुले,स्वाती चिटणीस, दीपाली कवडे, राधिका हंकारे, वंदना मोडक, संदिप कोद्रे, हेमंत बने, संजय शिंदे,आदिंसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, पुणे शहरातील प्रश्न शहराध्यक्ष प्रशांत जगताप हिरहिरेने मांडत आहेत. पक्षाशी एकनिष्ठ राहत त्यांनी धीराने सर्व कार्यकर्त्यांना बांधून ठेवले. पवार साहेबांवर लोकांचे प्रेम आहे, त्यांनी केलेल्या कामांचा आदर आहे. त्यामुळे थोडी मेहनत केली तर ती फळास येईल. हडपसर विधानसभा मतदारसंघ हा आपल्या हक्काचा. आपली जागा राखलीच पाहिजे. खासदार डॉ. अमोल कोल्हे येथील शेतकरी बांधवांचे प्रश्न कळकळीने लोकसभेत मांडत आहेत. त्यांच्या साथीने आपण भक्कमपणे उभे राहिले पाहिजे.
सैन्य मोठे असेल तर लढाई सोपी जाते. त्यामुळे बूथ कमिट्या मजबूत करा. त्याद्वारे घराघराला जोडले जा. घरातील चुलीपर्यंत पोहोचून महिला भगिनी यात महत्वाची भूमिका बजावतील. पवार साहेबांचे पुरोगमी विचार रुजवा. सरकारच्या चुकीच्या धोरणांचे खंडन करा, लोकांना त्याचे विश्लेषण द्या. राज्यात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय घोटाळे सुरू आहेत, गुन्हेगारी बळावली आहे. एक आमदराच कायदा हातात घेतोय. गृहमंत्र्यांकडून मला प्रचंड आशा होती. मात्र तेथेही निराशाच पदरी पडली. सत्ता टिकवण्यासाठी सरकार आमदरांपुढे शरण गेलेले आहे. राज्य हतबल झाले आहे. ते सावरण्याची जबाबदारी आपली आहे. असं देखील ते यावेळी म्हणाले.