नवी दिल्ली – देशातील महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून होत असलेल्या टीकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी अखेर मौन सोडले आहे. सगळ्या अडचणी आणि जागतिक स्वरूपाचे संकट असतानाही महागाई नियंत्रणाच्या संदर्भात भारताने खूप लवचिकता दर्शवली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की रोजगार निर्मितीला त्यांचे प्राधान्य आहे. गुंतवणुकीची गरज पूर्ण करणे हे आमच्या प्राधान्यक्रमात समाविष्ट आहे. देशाने सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. आता सरकार आर्थिक विकास आणि रोजगार वृध्दीकडे लक्ष देते आहे. कॉंग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले की अगोदर राजकीय पक्षांनी गरिबांचा विश्वास मोडला. मात्र आपण त्यांचा विश्वास मोडणार नाही. भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे प्रत्येक जण खालच्या पायरीवरून वर आला आहे. प्रत्येकाचे एक लक्ष्य आहे. मी कठोर परिश्रम आणि समर्पणामुळेच येथपर्यंत आलो आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांच्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या निवडीत सगळ्यांनाच चकित केल्याच्या संदर्भात ते म्हणाले नव्या पीढीला आणि नव्या रक्ताला संधी देण्याची आवश्यकता आहे. ही लोकतांत्रिक घुसळणच आमच्या पक्षाला जिवंत ठेवते आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात आशेचा दिवा तेवत ठेवते. कठोर परिश्रमाच्या आधारावर आपणही पक्षात उंची गाठू शकतो अशी भावना त्यांच्या मनात जागृत होते आणि त्यांना तसा विश्वास असतो. हे काही आमच्या पक्षात नव्याने होते आहे असे नाही. मी स्वत: याचे उदाहरण आहे. जेंव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री झालो तेंव्हा मला तोपर्यंत कोणताही प्रशासकीय अनुभव नव्हता. मी विधानसभेवर निवडून सुध्दा गेलो नव्हतो.
गॅरेंटी हा आपला केवळ एक शब्द किंवा आश्वासन नाही. गॅरेंटी या शब्दामुळे मी बांधिल होतो. लोकांच्या अनुभवातून मी शिकतो आणि जे चांगले असते ते करतो. इच्छा सूची नव्हे तर कार्य सूचीवर आमचा विश्वास आहे असे त्यांनी नमूद केले.
एका योजनेरुप आपण काम करत असून देशाला पुढे घेउन जाण्याचे आपले स्वप्न असल्याचे सांगत मोदी म्हणाले, २०४७ पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र करण्याचे सरकारचे स्वप्न आहे. आज सर्वच क्षेत्रांत आपण चांगले काम करत आहोत आणि माझ्या प्रत्येक निर्णयात देश प्रथम असतो. गेल्या दहा वर्षांत विकासाच्या कामात गती आली असून प्रशासनात सुधारणा करणे आपली आवड असल्याचे त्यांनी सांगितले.