नवी दिल्ली – कॅनडामधील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि कल्याण ही सरकारची प्राथमिकता असल्याचे सरकारने लोकसभेत सांगितले. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यासंदर्भात म्हणाले की, भारतीय उच्चायुक्त कार्यालय, वाणिज्य दूतावास भारतीय समुदायाच्या सतत संपर्कात आहेत. त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारतीय एजंटांचा सहभाग असल्याच्या आरोपानंतर दोन्ही देशांमधील संबंध गंभीर तणावाखाली आहेत. भारताने हे आरोप ठामपणे फेटाळले आहेत. ओटावाच्या २०२१ च्या जनगणनेच्या आकडेवारीचा हवाला देत मुरलीधरन म्हणाले की किमान ८.३ लाख कॅनेडियन नागरिक हिंदू आहेत आणि ७.७ लाख शीख आहेत.
पाकिस्तानमध्ये होतो हिंदूंचा छळ
भाजप खासदार गोपाल चिन्नया शेट्टी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुरलीधरन यांनी लोकसभेत सांगितले की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांच्या छळाच्या (विशेषत: हिंदूंच्या) बातम्या भारताला माहीत आहेत. आम्ही हा मुद्दा इस्लामाबादकडे अनेकदा मांडला आहे.
नवी दिल्लीला वेळोवेळी परदेशातील अल्पसंख्याक समुदायांवरील गुन्ह्यांची माहिती मिळते. आम्ही पाकिस्तानमधील अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यांचा छळ, हत्या, अपहरण, जबरदस्तीने धर्मांतर आणि जबरदस्तीने विवाह करण्याच्या विविध घटनांचीही नोंद घेतली. आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडण्याची जबाबदारी पाकिस्तान सरकारची आहे.
अफगाणिस्तानशी मैत्रीची भूमिका
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लोकसभेत लेखी उत्तरात सांगितले की, अफगाणिस्तानबाबत भारताचा दृष्टिकोन ऐतिहासिक संबंध, तेथील लोकांशी मैत्री आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संबंधित ठरावांवर आधारित आहे. अफगाणिस्तानचे राजनैतिक अधिकारी नवी दिल्लीत आहेत आणि मुंबई आणि हैदराबाद येथील वाणिज्य दूतावास कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांत काही अफगाण राजनैतिक अधिकारी भारत सोडून तिसऱ्या देशात स्थायिक झाले आहेत.