मुंबई– देशाला स्वातंत्र्य होऊन सत्तर वर्षे उलटली आणि या सत्तर वर्षांनंतर 2024 मधील निवडणुकांसाठी या देशाचे संविधान बदलण्याचे कारस्थान सुरू आहे. आज जी लोकशाही आहे ती बदलून ठोकशाही आणणार आहात का? संसदीय लोकशाही सोडून एकाधिकारशाही आणणार आहात? असे प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यावर थेट हल्ला चढवला.
मुंबई येथील शिवाजी पार्क (Shivaji park) मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) वतीने शनिवारी आयोजित केलेल्या संविधान सन्मान कार्यक्रमात वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप सरकारवर (Bjp Sarkar) थेट हल्लाबोल केला. यावेळी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनीसुद्धा संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजपवर हल्लाबोल केला.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, कॉंग्रेसला माझा आग्रह आहे की, कॉंग्रसनेही प्रत्येक राज्यात सभा घेऊन यावर चर्चा करावी, पण आम्हालाही त्या सभेत बोलवावे. आम्ही त्या संविधान बदलणाऱ्यांना विचारू की, संविधान का बदलता? बरं संविधान बदलता तर नवीन काय आणणार आहात? हे सांगा, तुम्ही म्हणता की, संविधान जुने झाले आहे. बरं तुमचे म्हणणे खरे जरी मानले तरी पण संविधान बदलणे म्हणजे घरातील एक भांड काढून दुसरे ठेवणे असे नाही. संविधान ही एक व्यवस्था आहे. तिला जर बदलता तर मग नवीन आणणार आहात त्याची चर्चा पण करत नाहीत, असेही ते म्हणाले.
सांस्कृतिक नाही तर यांचा वैदिक राष्ट्रवाद
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्यांच्या मागेपुढे काहीच नाही त्यांनी ही चर्चा सुरू केली आहे. मी मागे मोहन भागवत यांना आव्हान दिलं होतं की, या देशातील राष्ट्रवाद सांस्कृतिक आहे की, भौगोलिक असे विचारले होते. तुम्ही सांस्कृतिक राष्ट्रवाद म्हणता तर मग ते भौगोलिक राष्ट्रवाद होत नाही. असे जर असले तर मग त्या राष्ट्रवादाला ब्रिटिश राजवट असेच म्हणावे लागेल असाही हल्ला प्रकाश आंबेडकर यांनी केला.