जामखेड – विजेच्या तारा तुटल्याने चार महिन्यांपासून पाणीपुरवठा बंद आहे.महावितरणने दुर्लक्ष केल्याने कोल्हेवाडी येथील संतप्त महिलांनी आज सकाळी येथील महावितरण कार्यालयाला आले असता एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने टाळे ठोकून ठिय्या आंदोलन केले. महावितरण अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेत ठेकेदाराला वीजजोड करण्यास सांगितले. यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.
तालुक्यातील साकत ग्रामपंचायतींतर्गत असलेल्या कोल्हेवाडी येथे विजेच्या तारा तुटल्याने पाणीपुरवठा बंद आहे. याबाबत महावितरणला वारंवार माहिती देऊनही दुर्लक्ष केले गेले. दीपावली सण सुरू झाला, तरी विजेचे संकट दूर होईना म्हणून संतप्त महिलांनी जामखेड येथे टेम्पोमध्ये येऊन महावितरणच्या कार्यालयाला घेराव घालत कार्यालयाला टाळे ठोकले. जोपर्यंत वीजपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत टाळे उघडणार नाही यावर महिला ठाम होत्या. महावितरणच्या कार्यालयात एकही अधिकारी व कर्मचारी नव्हते. दीपावली सुटी असल्याचे वायरमनने सांगितले असता महिला सतंप्त झाल्या होत्या.
महिलांचा रूद्रावतार पाहून महावितरण खडबडून जागे झाले व ठेकेदाराला बोलावून तत्काळ कोल्हेवाडी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यास सांगितले. यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले. मनिषा कोल्हे, अलका कोल्हे, द्वारकाबाई कोल्हे, अनिता कोल्हे, उषा पवार, मैना कोल्हे, जयश्री सरोदे, मंगल कोल्हे, अंजली कोल्हे, गौरी कोल्हे, राणी कोल्हे, सिंधुताई कोल्हे, रतन शेख, सोनाली कोल्हे, शांताबाई कोल्हे, बायडाबाई कोल्हे, शालन कोल्हे, कांताबाई कोल्हे आदी महिला उपस्थित होत्या.