सातारा – कृष्णा खोरे लवादाचा निर्णय बदलण्याचा आणि पाण्याचे फेरवाटप करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. त्यांच्यामुळेच माण, खटावच्या वंचित भागाला पाणी उपलब्ध झाले आहे. टेंभूच्या आरक्षित अडीच टीएमसी पाण्याने 37 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. फडणवीस सोडून दुसरा कुणी नेता आजपर्यंत आपल्या पाठीशी उभा राहिला नाही, अशी खंत आ. जयकुमार गोरे यांनी व्यक्त केली. वंचित भागातील जनतेला पाणी देण्याचा विखळे येथील पाणी परिषदेत दिलेला शब्द मी पूर्ण केला आहे. माजी आयुक्तांनी निष्क्रियतेची व्याख्या सांगावी, अशी टीका त्यांनी केली.
टेंभू योजनेचे पाणी आरक्षित करून, वंचित गावांचा लाभक्षेत्रात समावेश केल्याबद्दल वरकुटे मलवडीत झालेल्या कृतज्ञता मेळाव्यात ते बोलत होते. सोनिया गोरे, बाळासाहेब जगताप, ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष करण पोरे, माजी नगराध्यक्ष विजय धट, सिद्धार्थ गुंडगे, अकील काझी, आनंदराव खरात, रामभाऊ नरळे, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या.
आ. गोरे म्हणाले, पाण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. 32 गावाना टेंभूचे पाणी देण्याची आग्रही भूमिका घेतली.
या भागाचे सर्वेक्षण करण्याचा आदेश फडणवीस यांनी 2919 साली दिला होता. आता पाण्याच्या फेरवाटपाचा निर्णय झाला आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळून, या योजनेचे काम लवकरच सुरू होईल. पाण्याची मागणी करणारे एकही पत्र माजी आयुक्तांनी दिले नाही. ज्यांनी आपल्याला झुलवत ठेवले, त्या पवारांना सत्तेतून पायउतार झाल्यावर, एक पत्र देण्याचे नाटक केले. मी आमदार झाल्यापासून मतदारसंघात दहा वर्षांपासून उरमोडीचा कालवा वाहतोय. एका वर्षात 350 कोटींचे रस्ते मंजूर करून आणले. पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामे सुरू आहेत. जिहे-कठापूर योजना पूर्णत्वाला जात आहे. तारळीचे पाणी येत आहे. एमआयडीसी उभी रहात आहे, तरीही माजी आयुक्त मला निष्क्रिय म्हणतात. “ठरलंयवाल्यां’चा एका झटक्यात कार्यक्रम करून, त्यांना घरी पाठवले.
फलटणकरांच्या छाताडावर खासदार बसवून तीन वेळा जनतेच्या आशीर्वादाने आमदार झालोय. माण-खटावचे भविष्य बदलण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करत आहे. निष्क्रिय विरोधक आता जागे झाले आहेत. मतदारांना विकत घ्यायची भाषा सुरू झाली आहे. स्वाभिमानी जनतेने त्यांची पैशाची मस्ती उतरवून त्यांना जमिनीवर आणावे. भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव शिंदे, चिन्मय कुलकर्णी, लीना कदम, प्रशांत गोरड, सचिन होनमाने, सतीश काटकर यांनी मनोगत व्यक्त केले.