आळंदी – “एक तारीख एक साथ एक तास’ या संकल्पनेतून महात्मा गांधीजींच्या जयंती निमित्त आळंदी नगरपरिषदेने आवाहन केल्यानुसार आळंदी नगरपरिषद व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता श्रमदान मोहीम पार पडली असून 1500 पेक्षा जास्त नागरिकांनी या मोहिमेत सहभाग नोंदवून साधारण 9 टन कचरा संकलित केल्याची माहिती, नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
“एक तारीख एक साथ एक तास’ या संकल्पनेतून आळंदी नगरपरिषेने केलेल्या आवाहनानुसार एम.आय.टी कॉलेज, डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, इंद्रायणी सेवा फाऊंडेशन, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान, आळंदी धाम सेवा समिती, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण इकाई, श्रीरामकृष्ण वारकरी शिक्षण संस्था, पतंजली, आळंदी नगरपरिषदच्या चारही शाळांचे शिक्षक व विद्यार्थी या व इतर अनेक संस्थांनी व आळंदीकरांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता श्रमदान मोहिमेत सहभाग नोंदविला.
इंद्रायणी नदी घाट, भाजी मंडई, बस डेपो, केंद्रे महाराज मठ परिसर, सिद्धबेट, काळे कॉलनी अशा एकूण 10 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली गेली व यात एकूण 9 टन कचरा संकलित करून नगरपरिषद मार्फत तो कचरा डेपोवर प्रक्रिया करण्यासाठी नेण्यात आला. आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी आपल्या अधिनस्त अधिकारी, कर्मचारी यांच्या समवेत स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवून स्वच्छता ही सेवा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
श्री आळंदी धाम सेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण, पोलीस मित्र रवींद्र जाधव, नितीन ननवरे, अर्जुन मेदनकर, एम. डी. पाखरे, अविनाश राळे, अनिल जोगदंड, राजेश नगरे, हिरामण तळेकर, सचिन शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेत मोहीम यशस्वीरित्या राबवली.