वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न आयुर्मानवाढीने अधिकच भीषण
नवी दिल्ली – आधुनिक शास्त्र व तंत्रज्ञान यामुळे माणसाचे आयुर्मान वाढले आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा प्रश्न अधिकच भीषण तऱ्हेने जगापुढे उभा राहिला आहे, असे विचार सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी येथील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स या संस्थेत साजऱ्या झालेल्या “इंजिनिअर्स दिना’चे प्रसंगी बोलताना व्यक्त केले. कितीही पट अन्नधान्य उत्पादन वाढविले, कितीही मोठे औद्योगीकरण झाले तरी वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण होऊच शकणार नाहीत.
पाकिस्तानमधील आणीबाणी समाप्त
इस्लामाबाद – पाकच्या लष्करी सत्ताधाऱ्यांनी देशातील आणीबाणी उठविली आहे. पाकमध्ये गेली 6 वर्षे आणीबाणीचा अंमल होता. याबरोबरच पाकिस्तान संरक्षण वटहुकुमाची अंमलबजावणी रद्द करण्यात आली आहे. या वटहुकुमामुळे सरकारला खास लवाद व कोर्ट स्थापन करण्याचा अधिकार मिळाला होता. 23 नोव्हेंबर 1971 रोजी त्या वेळचे लष्करी हुकुमशहा याह्याखान यांनी आणीबाणी लागू केली होती. आणीबाणीच्या अंतर्गत खटल्याशिवाय एखाद्या व्यक्तीस बेमुदत स्थानबद्ध करता येत होते.