– माधव विद्वांस
पत्रकार, कादंबरीकार आणि नाटककार जयवंत दळवी यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1925 रोजी गोव्यातील हडफडे गावी झाला. ते मूळचे वेंगुर्ल्यापासून आठ-नऊ किलोमीटर अंतरावर असलेल्या आरवली गावचे. जवळच्या शिरोडे येथे त्यांनी पाचवीपर्यंतचे शिक्षण घेतले. नंतर ते मुंबईला आले आणि घरच्या आग्रहाखातर मॅट्रिक झाल्यावर मुंबईच्या व्हीजेटीआय मध्ये टेक्स्टाइल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा घेण्यासाठी प्रवेश घेतला. पण पदविका शिक्षण अर्धवट सोडून मुंबईच्या “प्रभात’ दैनिकात ते रुजू झाले. आता हे दैनिक पुणे येथून प्रसिद्ध होते. तसेच काही काळ “लोकमान्य’मध्ये काम करीत होते.
त्यांनी इमोशन अँड इमॅजिनेशन अँड देअर प्लेस इन लिटरेचर’ या विषयावर संशोधन केले व प्रबंध सादर केला. अमेरिकन सरकारच्या मुंबई येथील माहिती खात्यात ते हजर झाले. त्यांनी वर्ष 1975 मधे वयाच्या पन्नासाव्या वर्षी केवळ लेखनासाठी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. बालपणी राष्ट्र सेवा दलाच्या श्रमदान मोहिमेत ते उत्साहाने भाग घ्यायचे. वर्ष 1948 मध्ये “नवा काळ’ दैनिकात त्यांची पहिली कथा “दातार मास्तर’ प्रसिद्ध झाली व त्यांच्या लेखनाचा श्रीगणेशा झाला. त्यांनी सुमारे 15 कथासंग्रह लिहिले. त्यातील “गहिवर’, “एदीन’, “रुक्मिणी’, “स्पर्श’ हे कथासंग्रह वाचकांना आवडले. त्यांनी 21 कादंबऱ्या लिहिल्या. “चक्र’, “स्वगत’, “महानंदा’, अथांग’, अल्बम’ या कादंबऱ्या महत्त्वाच्या आहेत. तसेच त्यांनी 19 नाटके लिहिली. “संध्याछाया’, “बॅरिस्टर’, “सूर्यास्त’, “महासागर’, “पुरुष’, “नातीगोती’ या नाटकांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
दळवींच्या लेखनामधे त्यांच्यातील पत्रकारितेचा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या “चक्र’ या पहिल्याच कादंबरीमध्ये हे जाणवते. अगदी वेगळ्या विषयावरची कादंबरी म्हणून “चक्र’ला प्रसिद्धी मिळाली. ही कादंबरी व्यक्तीचित्रावर, तेथील संघर्षावर व घटनांवर आधारित आहे. तेथे नायक किंवा कथानक नाही. त्यांच्या लेखनात शृंगार हा विषय प्रामुख्याने डोकावतो.
माणसाच्या जीवनावर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या प्रभा राहातातच व त्यातूनच चांगल्या वाईट गोष्टींचा उगम होतो व कथानके तयार होतात याचा विचार करूनच त्यांनी लेखन केले. “ललित’ मासिकात त्यांनी “ठणठणपाळ’ हे टोपणनाव घेऊन “घटका गेली पळे गेली’ हे सदर वीस वर्षे चालविले. “सारे प्रवासी घडीचे’मध्ये त्यांनी अनुभवलेल्या इरसाल कोकणी माणसांच्या व्यक्तीरेखा उभ्या केल्या आहेत.
“ठणठणपाळ’बद्दल विंदा करंदीकर म्हणतात, “ठणठणपाळच्या भूमिकेतून दळवींनी केलेल्या लिखाणाला व कार्याला तोड नाही. इतकी जागरूकता, इतके शहाणपण, इतका जिव्हाळा आणि इतका परखडपणा मराठी समीक्षात्मक विभागाला अजूनपर्यंत भेटलेला नव्हता.’
त्यांचे चिरंजीव गिरीश म्हणतात, “त्यांनी शाळेपासूनचे मित्र जपले होते. त्यामधे कारंडे काका, नाडकर्णी काका, भंडारे काका हे तिघेही मित्र दर महिन्याच्या एका रविवारी घरी एकत्र जमायचे व गप्पा चालायच्या. सर्व संभाषण ऐकताना फार मजा वाटायची.’ 16 सप्टेंबर 1994 रोजी त्यांचे निधन झाले.