सातारा – नैसर्गिक आपत्तीसारख्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबवण्यात येत आहे. फक्त एक रुपयात पीक विमा उतरवला जाणार असून, शेतकऱ्यांनी दि. 31 जुलैपूर्वी पीक विमा काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी केले आहे.
फक्त एक रुपयात पीक विमा योजनेसाठी शेतकरी वेब पोर्टलवर थेट अर्ज करू शकतील. त्यासाठी रुुु.िाषलू.र्सीें.ळप या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे. विमा हप्त्याची रक्कम (एक रुपया) पेमेंट गेटवेद्वारे ऑनलाइन भरायची आहे. संकेतस्थळावर पूर्ण अर्ज भरल्यानंतर क्रमांकासह पोचपावती मिळेल. शेतकऱ्यांनी नोंदणी केलेल्या मोबाइल नंबरवरही एसएमएस पाठवून सुचित करण्यात येईल, असे माईनकर यांनी सांगितले.
खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुलतेमूळे त्या क्षेत्रात सर्वसाधारण क्षेत्राच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी न झाल्यास संबंधित विमा क्षेत्र घटक, पीक विमा योजनेंतर्गत नुकसानभरपाईस पात्र राहील. पेरणीनंतर 30 दिवस आणि काढणीच्या आधी 15 दिवस पूर, पावसातील खंड, दुष्काळ यामुळे अपेक्षित उत्पादनात, मागील सात वर्षांच्या सरासरीच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्यास, त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळेल. जी पिके काढणीनंतर शेतात पसरवून ठेवणे अथवा पेंड्या बांधून सुकवणे जरूरी असते, त्या ठिकाणी पिकांच्या काढणीनंतर दोन आठवड्यांत गारपीट, चक्रीवादळ आणि त्यामुळे पडलेला पाऊस, बिगरमोसमी पाऊस आदी आपत्तींमुळे पसरून ठेवलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात येईल, असे विजय माईनकर यांनी सांगितले.
स्थानिक आपत्तीअंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्याने नैसर्गिकरित्या लागणारी आग आदी स्थानिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून भरपाई निश्चित करण्यात येणार आहे. ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, भुईमूग या पिकांसाठी उत्पादनाच्या आधारे नुकसानभरपाई निश्चित केली जाते. यामध्ये पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत निश्चित होणारी नुकसानभरपाई शासनाने निर्धारीत केलेल्या उत्पन्नाच्या सरासरी आकडेवारीवर आधारित असेल. स्थानिक आपत्ती आणि काढणीनंतर पसरवून ठेवलेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत संबंधित बॅंक किंवा विमा कंपनीला देणे आवश्यक आहे, असेही माईनकर यांनी सांगितले.
पीक विमा नोंदणी कोठे करावी?
-जिल्ह्यातील सर्व सीएससी केंद्र
-महा ई-सुविधा केंद्र
-“आपले सरकार’ केंद्र
-सर्व राष्ट्रीयीकृत बॅंका, जिल्हा मध्यवर्ती बॅंक
पीक विमा नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे
-शेताचा 7/12 उतारा, 8 अ उतारा
-आधारकार्ड
-बॅंक पासबुक
-पीक पेराचे स्वयंघोषणा पत्र, ई-पीक पाहणी बंधनकारक