– हिमांशू
नमस्कार! मी एक भाग्यवंत मतदार आहे. पुढारलेल्या महाराष्ट्रात मी जन्म घेतला हे माझं पहिलं भाग्य होय. म्हणजे, मी जन्म घेतला तेव्हा तरी माझं राज्य देशात सर्वाधिक पुढारलेलं होतं. उद्योगांपासून शेतीपर्यंत आणि सामाजिक, शैक्षणिक चळवळींपासून सहकार चळवळीपर्यंत सर्वकाही उभारणारी उत्तुंग माणसं इथं पूर्वीच होऊन गेली. अर्थातच, राज्याचं अव्वल स्थान कायम राखण्यासाठी मला स्वतःला काहीच करावं लागलं नाही. “विकास’ वगैरे आपोआपच होत गेला.
विशेष म्हणजे “विकास’ शब्दाची व्याख्याही मला आयतीच मिळाली, त्यामुळे जे घडतंय तोच “विकास’ याची खात्री पटण्याइतकी माझी व्हिजन विस्तारली. मुद्दा एवढाच राहिला, की हा विकास करायचा कुणी? तर, याचंही उत्तर मला आयतंच मिळालं. जे सत्तेवर असतील त्यांनी विकास करायचा.
एकाच वेळी दोन पक्ष सत्तेत असतील तर दोघांनी करावा, तीन पक्ष असतील तर तिघांनी करावा! अशा सरकारला “तीन चाकांची गाडी’ म्हणावं की “त्रिशूळ’ म्हणावं, हा मुद्दा गौण… बाकी भ्रष्टाचार वगैरेही बकवास! महत्त्वाचा मुद्दा एकच- ज्याला विकास करायचाय त्यानं सरकारमध्ये जावं; विरोधात राहू नये. विधिमंडळात विरोधी बाकांवर बसणारे लोक म्हणजे माझ्या दृष्टीनं “हरलेले लोक’ होत. त्यामुळे हरलेल्यांनाही जिंकण्याची संधी देणारी व्यवस्था लोकशाहीत असायला हवी, असं आधीपासून वाटायचं. आता तशी व्यवस्था आकाराला येत असल्यामुळे मी पुन्हा एकदा भाग्यवंत मतदार ठरलोय.
एखादा मंत्री पडलेल्या उमेदवारांना जास्त निधी देतो, ही काय नाराज होण्याजोगी बाब आहे? “काम करताना दुजाभाव करणार नाही,’ अशी शपथ मंत्रिपदाच्या बरोबरच दिली जाते ना? मग जिंकलेला-पडलेला असा भेदभाव का करावा? अर्थात, तरीही नाराज होण्याचा हक्क प्रत्येकाला आहे. “विकास करण्यासाठी’ विरोधातून सरकारात जायचं आणि तो करण्यापासूनच वंचित राहायचं हे काही बरोबर नाही. विकास करण्याच्या संधी मंत्रिपदाच्या संख्येइतक्या मर्यादित आहेत, त्यात बिचाऱ्या आमदारांचा काय दोष? विकास करण्याची तीव्र इच्छाशक्ती महत्त्वाची. ती जसजशी वाढत जाईल, तसतशी पदांची संख्याही वाढवायला नको का? विकासाच्या, महाराष्ट्राला आघाडीवर नेण्याच्या बाबतीत कुणीही असमाधानी राहता कामा नये.
इच्छुकाला याचक म्हणणं हा विकासाच्या नैसर्गिक प्रवृत्तीचा अपमान आहे. अशा लोकांना महत्त्वाकांक्षीच म्हणायला हवं आणि महत्त्वाकांक्षा हाच विकासाचा पाया आहे. विरोधात असताना नाराज आणि सरकारात गेल्यावरही नाराज, असं कसं चालेल? बॅलन्स करताना सर्कस करावी लागणार हे मान्य; पण सर्कशीचे खेळ तरी पूर्वीसारखे कुठे होतात हल्ली? कालौघात लुप्त होत चाललेली सर्कस पाहायला मिळत असल्यामुळे मी पुन्हा एकदा भाग्यवंत मतदार ठरलोय.
विकास करू पाहणाऱ्याला “स्वाभिमान’ असला पाहिजे. तो जर कुणी डिवचला, तर त्याला खणखणीत प्रत्युत्तर देता आलं पाहिजे. संबंधिताचे बॅनर फाडणारी टीम सोबत पाहिजे. नुसती असून चालणार नाही, तर ती दिसली पाहिजे. एकदा ती दिसली की “स्वाभिमान’ शतगुणित होतो आणि नाराज होण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. या ऊर्जेनं रसरसलेले लोकप्रतिनिधी आणि असंख्य “भावी मुख्यमंत्री’ मला लाभलेले असल्यामुळे मी भाग्यवंत मतदार ठरलोय.