बीड : स्वतःच्या मोबाईलमध्ये स्वतःचेच भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेऊन एका वीस वर्षीय तरुणाने आपले जीवन संपवले आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील नेकनूर तालुक्यातील अंधापुरी गावात घडली आहे. काकासोबत वारंवार होत असलेल्या शेतीच्या वादातून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणाने उचलेल्या पावलामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
शुभम बाळासाहेब जगताप असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शेतीच्या वादाच्या तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. शुभम जगताप हा पहाटे पाचच्या सुमारास घरातून बाहेर पडला. त्यानंतर स्वतःच्या मोबाईलवर त्याने भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवल्यानंतर शेतातील बाभळीच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना सकाळी सात वाजेच्या सुमारास गावातील काही तरुणांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याचा शोध घेतला. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.
गेल्या काही दिवसांपासून शुभम आणि त्याच्या काकामध्ये शेतीच्या वादातून भांडण सुरू होते. त्यामुळे या वादाला आणि काकाच्या त्रासाला कंटाळून शुभमने आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे मामा शिवाजी घरत त्यांनी केला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेकनूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन या घटनेचा पंचनामा केला आहे.
पोलीस या प्रकरणाचा देखील तपास करत आहेत. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी नोंद केली असून, पुढील तपास करण्यात येत आहे. मात्र शुभमने टोकाचे पाऊल उचलल्याने अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, शुभमच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.