नवी दिल्ली – आज दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 25 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी मोठी घोषणा केली. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.
यासोबतच पक्षातील इतर काही नेत्यांवर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्याचीही घोषणा यावेळी पवारांनी केली आहे. मात्र, यामध्ये अजित पवार यांचे नाव नसल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अजित परांवर अन्याय झाला का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे. या दरम्यान शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
यावेळी शरद पवार यांना दोन कार्यकारी अध्यक्ष का नेमले? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “देशात आगामी काळात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रासह आणखी काही राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी याबाबत निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
तसेच ते पुढे म्हणाले, “या मागे दोन गोष्टी आहेत. या देशाची रचना पाहिल्यानंतर, तीन, चार, पाच जे महत्त्वाची राज्य आहेत, सर्व राज्याची जबाबदारी एका व्यक्तीवर दिली तर आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही विविध सहकाऱ्यांना जबाबदारी देवून कामं वाटून घेतले आहेत.
जेणेकरुन आम्ही आगामी लोकसभे निवडणुकीपर्यंत लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांची निवड केली गेली त्यांच्याबाबत लोकांची मागणी होती की, त्यांना जबाबदारी देण्यात यावी. त्याचा विचार करुन जबाबदारी देण्यात आली आहे’. असं देखील पवार यावेळी म्हणाले.