राजेंद्र भुजबळ
शिर्डी – शिर्डीचा गुन्हेगारीचा वाढता आलेख ही चिंतेची बाब असली, तरी याला फक्त पोलीस प्रशासन जबाबदार आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कारण लॉक डाऊननंतर शिर्डीत दाखल झालेले अनेक परप्रांतीय लोक मिळेल त्या ठिकाणी भाडोत्री खोल्या घेऊन राहत आहे. यात अनेक व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आहेत हे पोलीस तपासात उघड झाले असले, तरी स्थानिक नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी आहे ही बाब अनेकजण विसरले असून, केवळ पैशाच्या मोहापायी त्यांनी अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आश्रय दिला आहे.
शिर्डीतील उपनगरे, निमगाव, पिंपळवाडी, सावळीविहीर यांसह अनेक ठिकाणी वास्तव्यास असणाऱ्या अनोळखी परप्रांतीय लोकांचे कुठलेही ओळखपत्र अथवा विचारपूस न करता सर्रासपणे रूम्स भाड्याने दिले जात आहे. हेच लोक शिर्डीत मिळेल त्या ठिकाणी खास करून मंदिर परिसरात अतिक्रमण करून अनेक प्रकारचे व्यवसाय करत आहे. मात्र त्यांनी सुरू केलेला उच्छाद ही डोकेदुखी पोलीस प्रशासन, नगरपरिषद प्रशासनाला झाली आहे.
यावर आळा घालण्यासाठी दररोजची कारवाई जरूरी असून, सध्यातरी याच परप्रांतीय अनोळखी लोकांचा शिर्डी शहराला विळखा पडला असून, त्यातूनच गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. सोनसाखळी चोरी, पाकीटमारी, बाईकचोरी, स्टॅंडर्ड बूट चप्पल चोरी, रस्त्यावर नकली आयुर्वेदिक औषधे विकणारी टोळी या माध्यमातून भाविकांना व स्थानिकांना मोठा त्रास होत आहे. शिर्डीसारख्या संवेदनशील तीर्थस्थानी खून, खुनाचे प्रयत्न, बलात्कार, दरोडे, पॉलिशवाले व एजंटच्या माध्यमातून भाविकांची लूट या घटनेने शिर्डी शहराचे नाव देश-विदेशात बदनाम होत आहे.
पोलिसांचे अपुरे संख्याबळ, स्थानिकांचा बेजबाबदारपणा, नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष याचाच फायदा गुन्हेगारांना होत असून यावर वेळेतच पायबंद बसला नाही तर पुढील भविष्य भयानक रूप धारण करू शकते. शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी कडक पाऊले उचलून अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या, तरी त्यांना स्थानिक नागरिकांची व नगरपरिषद प्रशासनचीही साथ भेटणे गरजेचे आहे.
आत्मपरीक्षणाची गरज
शिर्डी शहराच्या माळीनगर भागात एका महिलेचा झालेला निर्घृण खून आणि त्याचा न लागलेला तपास यावरून शिर्डी शहर हे गुन्हेगारांचं सेफ्टी ठिकाण झालं आहे का? हाच प्रश्न उभा राहिला असून, याला फक्त पोलिसच जबाबदार आहे असं म्हणणाऱ्या नागरिकांनी आता आत्मपरीक्षणाची गरज आहे. शहराचे भविष्य आपल्या सर्वांच्या हाती आहे हे समजलं तरी पुष्कळ!
माझं गाव! माझी जबाबदारी!! ही संकल्पना शिर्डीच्या सर्वपक्षीय नेत्यांनी अंमलात आणली होती. मात्र, याचा आता सर्वांना विसर पडला आहे की काय? कारण शिर्डीचा गुन्हेगारीचा वाढता आलेख ही सर्वांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले.