मुंबई- संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गट शिवसेना यांच्यातील युती गेल्या आठवड्यापासून पुन्हा चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे संभाजी ब्रिगेड कडून लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली आहे. त्यामुळे या युतीत कुठंतरी बिनसले आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. या नाराजी नाट्याला दूर करण्यासाठी आज मुंबईत ठाकरे गट शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची बैठक पार पडली.
यात आगामी काळात दोन्ही पक्ष संघटनेकडून एकत्रित मेळावे घेऊन जनजागृती केली जाईल, असे जाहीर करण्यात आले. तसेच लवकरच मोठा मेळावा होईल, असे प्रतिपादन खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले. सावंत म्हणाले की, संभाजी ब्रिगेड व शिवसेना यांच्यातील युती सक्षम आहे. संभाजी ब्रिगेड हे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. उभ्या महाराष्ट्रात, एकजुटीचे भल्याचे प्रश्न घेऊन काम करणार आहोत. पदाधिकारी यांचा बैठक होऊन संयुक्त मेळावा होईल. असा निर्णय घेण्यात आला.
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यासह संभाजी ब्रिगेडचे महत्त्वाचे नेते या बैठकीला उपस्थित होते.
शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड या दोन पक्षांनी एकत्र येणार असल्याचे निर्णय मागील वर्षी जाहीर केले होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आता या घोषणेला सात ते आठ महिने झाले आहेत. परंतु अजूनही संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीत घेतले गेले नाही. त्यावर फक्त शिवसेना ठाकरे गटाकडून चर्चा केली जात आहे. आता संभाजी ब्रिगेडने केलेल्या मागणीवरुन उद्धव ठाकरे यांच्यापुढे नवे संकट निर्माण झालेले आहे.
महाविकास आघाडीत मतभेद-
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट आला आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटप संदर्भात खासदार संजय राऊत यांच्यांकडून दावा केला जात आहे. त्या दाव्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विरोध केला जात आहे. खासदार राऊत यांच्या दाव्यानुसार महाविकास आघाडीतील 19 पेक्षा जास्त जागा ठाकरे गट लढवणार आहे. यावरुन महाविकास आघाडीत मतभेद होत आहेत.
या जागांवर संभाजी ब्रिगेडचा दावा –
संभाजी ब्रिगेडही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. संभाजी ब्रिगेडकडूनही लोकसभेच्या तीन जागांची मागणी करण्यात आली आहे. ज्यात पुणे, हिंगोली आणि बुलढाण्याच्या जागांची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या तीन जागा संभाजी ब्रिगेडला देण्याची मागणी केली गेली आहे. यापूर्वीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्यांकडे तीन जागांची मागणी केल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी दिली.