औंध -शिवाजीनगर ते हिंजवडी या मार्गावरील मेट्रोसाठी कामगारांची भरती केली जाणार आहे. मात्र, या भरतीची जाहिरात बिहारमधील वृत्तपत्रात देण्यात आली आहे. याचा निषेध करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मेट्रो प्रशासन आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या कार्यालयासमोर जोरदार निषेध आंदोलन केले. स्थानिकांना नोकरीपासून वंचित ठेवत बिहारच्या तरुणांना रोजगार का देता? असा सवाल या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आला.
पुण्यात सध्या मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे बहुतांश काम पूर्णही झाले आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील मेट्रोचे काम देखील वेगाने सुरू आहे. या मार्गावर मेट्रोसाठी लागणाऱ्या विविध पदांवर कर्मचाऱ्यांची नोकर भरती केली जाणार आहे. यासाठीची जाहिरात मात्र बिहारमधील वृत्तपत्रात प्रसिद्ध केल्याचा आरोप करीत मनसेने आंदोलन केले.
औंध येथील पीएमआरडीएचा कार्यालयासमोर मनसैनिकांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पीएमआरडीए आणि मेट्रो प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. पुण्यात मेट्रो प्रकल्प राबवित असताना स्थानिकांना रोजगार देणार असल्याचे राज्य सरकार आणि मेट्रो प्रशासनाने जाहीरपणे सांगितले होते. मात्र, राज्य सरकार आणि मेट्रो प्रशासनाला याचा विसर पडला असल्याचा आरोप मनसेकडून उपस्थित करण्यात आला.