मुंबई -भारताच्या कसोटी संघातून तसेच केंद्रीय करारातून वगळण्यात आलेल्या अजिंक्य रहाणेला बीसीसीआयने कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी दिली असून त्यासाठीच हे संकेत दिले आहेत. आयपीएल स्पर्धेत रहाणे जरी खेळत असला तरीही त्याला लाल चेंडूवरही सराव करण्याची सूचना बीसीसीआयने केली आहे.
रहाणेला केवळ संघातूनच वगळण्यात आले नव्हते तर त्याच्याकडचे उपकर्णधार पदही काढून घेतले गेले होते. त्यानंतर रहाणेच्या संघातील पुनरागमनाचे दरवाजे जवळपास बंदच झाले होते. दरम्यान रहाणेने देशांतर्गत स्पर्धेत सातत्याने धावा केल्या. आयपीएल रहाणेने यंदा सातत्याने धावा केल्या आहेत. त्यातच त्याने आपण मॅचफिट असल्याचेही सिद्ध केल्यामुळेच बीसीसीआयची निवड समितीही प्रभावीत झाली.
त्यातच कसोटी संघातील श्रेयस अय्यर याच्या पाठीवर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्याने व तो पुढील तीन महिने मैदानाबाहेरच राहणार असल्याने रहाणेचा कसोटी संघातील समावेश निश्चित झाला आहे. रहाणेला इंग्लंडच्या वातावरणात खेळण्याचा अनुभवही जास्त आहे म्हणूनच आयपीएल स्पर्धा संपल्यावर लगेचच लाल चेंडूवर सराव सुरू करण्याचे संकेत बीसीसीआयने रहाणेला दिले आहेत. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या 7 ते 11 जून या कालावधीत इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर होत आहे.