मुंबई – बागेश्वर बाबा उर्फ पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे सध्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले आहे. यापूर्वी त्यांनी संत तुकाराम यांच्याविषयी एक वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यावर त्यांनी माफी मागितली होती. ते वादळ शांत होत नाही तोच त्यांनी साईबाबा यांच्याविषयीही वादग्रस्त विधान केले. यावरून धार्मिक भावना दुखावल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला. काही ठिकाणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला. मात्र हा वाद आणखी वाढत असल्याने अखेर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माफीनामा जारी केला आहे.
याप्रकरणी धीरेंद्र शास्त्रींनी बागेश्वर धामच्या ट्विटर हँडलवरून माफी मागितली आहे. “संत आणि महापुरुषांबद्दल मला नेहमीच आदर आहे, मी एक म्हण सांगितली ज्याचा अर्थ होतो की, जर आपण छत्री मागे ठेवून शंकराचार्य आहोत असे म्हटले तर हे कसे होईल. आपल्या शंकराचार्यांनी जे सांगितले होते, त्याचाच आपण पुनरुच्चार केला होता.”
पुढे ते म्हणाले, “साईबाबा हे संत फकीर असू शकतात आणि लोकांची त्यांच्यावर वैयक्तिक श्रद्धा आहे, जर कोणी संत गुरूला वैयक्तिक श्रद्धेने देव मानत असेल तर ती त्याची वैयक्तिक श्रद्धा आहे, आमचा त्याला विरोध नाही… आमच्या कोणत्याही शब्दाने कोणाचेही मन दुखावले असेल, तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. ”
मेरा हमेशा संतों के प्रति महापुरुषों के प्रति सम्मान है और रहेगा मैंने कोई एक कहावत बोली जो हम अपने संदर्भ में बोल रहे थे कि अगर हम छतरी पीछे लगाकर कहें कि हम शंकराचार्य हैं तो ये कैसे हो सकता है…हमारे शंकराचार्य ने जो कहा वो हमने दोहराया कि साईं बाबा संत फ़क़ीर हो सकते हैं और… pic.twitter.com/aHWnC0Leal
— Bageshwar Dham Sarkar (Official) (@bageshwardham) April 5, 2023
धीरेंद्र शास्त्री साईबाबांविषयी काय म्हणाले होते ?
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मध्यप्रदेशच्या जबलपूरमध्ये साईबाबांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. “साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकतं नाही.”
“आमच्या धर्माचे शंकराचार्य यांनी साई बाबांना ईश्वराचं स्थान दिलेलं नाही. शंकराचार्य यांचं मत मानणं अनिवार्य आहे. त्यांच्या मताचं पालन करणं प्रत्येक सनातनी व्यक्तीचं कर्तव्य आहे. कारण ते धर्माचे पंतप्रधान आहेत. कोणतेही संत ते आपल्या धर्माचे असो अथवा दुसऱ्या त्यांना ईश्वराचं स्थान देता येणार नाही. कोणतेही संत ते तुलसीदास असतील, सूरदास असतील किंवा इतर कोणतेही ते केवळ महापुरुष आहेत, युगपुरूष आहेत, परंतु ते देव नाहीत,” असे विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केलं होतं.