Rahul Gandhi – काँग्रेसने आरोप केला की राहुल गांधी यांना वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरात कॅमेरा घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली. दिल्लीत बसलेल्या “कॅमेराजीवी” नेत्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना राहुल गांधींच्या दर्शनाच्यावेळी कॅमेरा नेण्याची परवानगी दिली नाही असा आरोप उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय राय यांनी केला.
ते म्हणाले की भाजप नेत्यांना मंदिराच्या आवारात कॅमेरे घेऊन जाण्याची परवानगी आहे परंतु राहुल गांधींना मात्र तो अधिकार नाकारला गेला. भारत जोडो न्याय यात्रा वाराणसीत आली त्यावेळी राहुल गांधींनी काशी विश्वनाथ मंदिराला भेट दिली आणि बाबा विश्वनाथ आणि माँ गंगा यांचे दर्शन घेतले. ( Rahul Gandhi )
भाजपच्या प्रत्येक नेत्याला त्यांच्या कॅमेऱ्यासह मंदिरात जाण्याची परवानगी आहे, परंतु आम्हाला प्रशासनाने परवानगी दिली नाही. सकाळी साडे दहाच्या सुमारास राहुल गांधींनी काशीतील बाबा विश्वनाथ मंदिरात प्रार्थना केली. शेवटच्या क्षणी, मंदिरात प्रवेश करण्यासाठी आमच्या कॅमेऱ्याला दिलेली परवानगी रद्द करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने आम्हाला आश्वासन दिले की ते राहुल गांधींच्या भेटीचे फोटो हे मंदिराच्या कॅमेरामनद्वारे शेअर केले जाणार आहेत. साडेतीन तास सतत प्रयत्न करूनही फोटो देण्यात आले नाहीत. त्यानंतर सात फोटो पाठवण्यात आले परंतु त्यातील एकही फोटो मंदिराच्या कॅमेरामनने काढला असला तरी काशी विश्वनाथाच्या दर्शनाचे नव्हते.
एक्सवरील पोस्टमध्ये काँग्रेसने म्हटले आहे की, ‘असे करून वाराणसीच्या जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा सिद्ध केले की ते दिल्लीत बसलेल्या कॅमेराजीवीच नेत्यांचाच आदेश मानतात. हे केवळ राजकारण किंवा कुरघोडी नाही तो शुद्ध हा क्षुद्रपणा आहे.
पण हे लक्षात ठेवा की शिवभक्ताला त्याच्या संकल्पापासून रोखता येत नाही आणि न्यायाच्या या महान लढ्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही. बाबा विश्वनाथ सर्वांचे भले करो आणि दुष्टांना सद्बुद्धी देवो असेही कॉंग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो न्याय यात्रा’ शुक्रवारी बिहारमधून उत्तर प्रदेशात दाखल झाली आणि शनिवारी वाराणसीला पोहोचली.