पुसेगाव – सध्या सर्वत्र लाल मिरचीच्या दरात वाढ झाल्याने गृहिणीचे आर्थिक बजेट आणखीन कोलमडणार आहे. आधीच मागील आठवड्यात पन्नास रुपयाने गॅसचे दर वाढल्याने सर्वसामान्य गृहिणीकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच लाल मिरचीचे दर वाढल्याने गृहिणींमधून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
दरवाढीमुळे आधीच सर्वसामान्यांना चटके सोसावे लागत आहेत. त्यातच मागील काही महिन्यापासून वातावरणाचा सततच्या बदलामुळे रब्बीसह इतर पिकावरही वातावरणाचा परिणाम झालेला आहे. या बदलत्या वातावरणाचा फटका मिरची उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसलेला आहे. त्यामुळे बाजारात येणाऱ्या लाल मिरचीचे प्रमाण कमी असल्याने मिरचीचे दर वाढल्याचे बोलले जात आहे.
या महिन्यात मिरचीच्या दरात क्विंटलमागे तीन ते चार हजार रूपयांची वाढ झाल्यामुळे एक किलोमागे तीस ते पन्नास रुपये वाढले असल्याचे सांगितले जात आहे. या वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाल्याचे दिसून येत आहे. आधीच गॅस सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ झाली आहे. आणि आता लाल मिरचीचे दर वाढत आहेत. त्यामुळे आमचे आर्थिक गणित बिघडले असल्याची प्रतिक्रिया बुध येथील गृहिणी सौ. प्रगती जाधव यांनी व्यक्त केली आहे. तर वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्याचे कंबरडे मोडले जात आहे. दिवसेंदिवस वाढती महागाई ही सर्वसामान्यासाठी चिंतेची बाब आहे. महागाई जर आटोक्यात आली नाही तर सर्वसामान्यांची जगणे मुश्किल होईल, अशी प्रतिक्रिया सौ. प्रतीक्षा घाटगे यांनी व्यक्त केली आहे.