नारायणगाव -तमाशाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रपती पदक विजेत्या विठाबाई भाऊ मांग तमाशानगरीत गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 100 ते 150 तमाशाचे करार झाले असल्याची माहिती मोहित नारायणगावकर यांनी दिली. आजच्या दिवयी सुमारे दिड ते दोन कोटींची तर महिनाभरात सुमारे 10 कोटींची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण भागात यात्रा – जत्रांचा हंगाम सुरू होत असल्याने गावोगावचे ग्रामस्थ गुढीपाडव्याच्या दिवशी तमाशा ठरविण्यासाठी नारायणगावच्या तमाशा पंढरीत दाखल होतात. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे जिल्ह्यातून बारामती, इंदापूर, दौंड; अहमदनगर जिल्ह्यातून संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा; नाशिक जिल्ह्यातून इगतपुरी, सिन्नर, निफाड यांसह सांगली,
सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक ग्रामस्थांनी तमाशाचा करार करण्यासाठी तमाशा पंढरीत हजेरी लावली होती. नारायणगावच्या तमाशा पंढरीत 30 ते 33 नामांकित तमाशा फड मालकांच्या राहूट्या असून प्रत्येकाचे सरासरी एक लाखापासून दीड लाखापर्यंत सरासरी 5 ते 10 करार झाले आहेत. यावर्षी प्रत्येक तमाशा फड मालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे.
ऑनलाइन बुकिंग
बदलत्या काळानुसार तमाशा क्षेत्रातही क्रांती होत आहे. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी अथवा त्यानंतर मोठ्या प्रमाणात तमाशा करार होत होते; परंतु ग्रामीण भागातील अनेकांना आपल्या पसंतीचा तमाशा मिळत नसल्याने व्हॉट्सपच्या माध्यमातून तमाशाचे करार केले जात असून, ऑनलाइन ऍडव्हान्स रक्कम पाठवली जात आहे.
तमाशाचे करार करत असताना तमाशाच्या व्यवस्थापका बरोबर चर्चा करून तमाशाची रक्कम व तारीख ठरविली जाते. परंतु अनेक वेळा तमाशा ठरलेल्या वेळेत गावात पोहोचत नाही, कलाकारांची संख्या सांगितल्याप्रमाणे नसते, कलेचा दर्जा लोक पसंतीस उतरत नसल्याने ग्रामस्थ नाराज होतात. त्यामुळे तमाशा फड मालकांनी लोककलेचा दर्जा जास्तीत जास्त चांगला ठेवण्याचा प्रयत्न करावा.
-ज्ञानेश्वर शेळके, कानगाव (दौंड) अध्यक्ष भाजपा पुणे जिल्हा किसान मोर्चा