मुंबई :- केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी काही सेवानिवृत्त न्यायाधीश “भारतविरोधी टोळी”चा भाग असल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे न्यायव्यवस्थेवर दबाव आणण्याचा आणि न्यायाधीशांना धमकावण्याचा प्रयत्न आहे असे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दिल्लीत आयोजित इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना रिजिजू यांनी दावा केला होता की काही सेवानिवृत्त न्यायाधीश आणि काही कार्यकर्ते “भारतविरोधी टोळीचा भाग” आहेत आणि ते भारतीय न्यायव्यवस्थेत विरोधी पक्षाची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, “ही कसली लोकशाही आहे? एखाद्या कायदामंत्र्यांनी न्यायव्यवस्थेला धमकावणं शोभतं का? सरकारपुढे नतमस्तक होण्यास नकार देणाऱ्या न्यायमूर्तींना धोका आहे आणि रिजीजू यांचे वक्तव्य त्याचाच दाखला आहे. देश म्हणजे सरकार नाही आणि सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही, असे राऊत म्हणाले.
राहुल गांधींनी देशातील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केल्यानंतर आता कॉंग्रेस नेत्याला लोकसभेतून निलंबित करण्याच्या हालचाली सुरू आहेत असे ते म्हणाले.
Elections 2024 : विधानसभेच्या जागा वाटपाबाबत बावनकुळे यांचे घुमजाव, म्हणाले “अजून जागा…”
राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, या मागणीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, राहुल गांधी माफी मागणार नाहीत आणि त्यांनी ती का मागावी? भारतीय जनता पक्षाचेच नेते विदेशातील भूमीत देश विरोधी वक्तव्ये करीत असतात असा आरोप त्यांनी केला.