नवी दिल्ली – भारतामध्ये इन्फ्लुएंझा व्हायरस “एच3 एन2′ या विषाणूने आपला प्रकोप दाखविण्यास सुरुवात केली आहे. या विषाणूमुळे हरियाणा व कर्नाटकातील प्रत्येकी एक अशा दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अधिक माहितीनुसार, कर्नाटकमधील 82 वर्षीय हसन हा इन्फ्लुएंझा विषाणूमुळे मृत्यू पावणारा देशातील पहिला व्यक्ती ठरला आहे. त्याशिवाय हरियाणा येथेही एका व्यक्तीचा इन्फ्लुएंझामुळे मृत्यू झाल्याने राज्यांत भितीचे वातावरण आहे.
आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकमधील व्यक्तीला 24 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 1 मार्च रोजी त्याचे निधन झाले. त्या व्यक्तीला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा आजार होता. देशभरात “एच3 एन2′ या विषाणूचे 90 रुग्ण आढळले आहेत. तर, “एच1एन1′ या विषाणूचेही आठ रुग्ण आढळले आहेत.
गेल्या महिन्यात देशभरात तापाच्या साथीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसले. यामध्ये बहुतांश रुग्ण “एच3 एन2′ या विषाणूने संक्रमित असल्याचे समोर आले. या विषाणूला “हॉंगकॉंग फ्लू’ या नावानेही ओळखले जाते. हा विषाणू भारतामधील इतर इन्फ्लुएंझा सब व्हेरियंटच्या तुलनेत अधिक शक्तीशाली आहे.
करोनासारखी लक्षणे
भारतामध्ये आतापर्यंत फक्त “एच3 एन2′ आणि “एच1एन1′ संक्रमित रुग्ण मिळाले होते. या दोन्ही विषाणूंची लक्षणे करोना व्हायरससारखीच आहेत. या विषाणूने जगभरात अनेकांना बाधित केले आहे. करोना महामारीला दोन वर्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा “प्लू’ च्या रुग्णात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे.
“एच3 एन2′ विषाणू संसर्गाची लक्षणे
– ताप, खोकला आणि वाहणारे नाक तसेच शरीरदुखी, मळमळ, उलट्या किंवा जुलाब
“एच3 एन2′ विषाणूपासून संरक्षण कसे कराल?
“एच3 एन2′ विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मास्क घालण्याचा, हात वारंवार धुण्याचा आणि सामाजिक अंतर राखण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. डॉ. गुलेरिया यांनी सांगितले आहे की, या इन्फ्लूएंझापासून गंभीर आजाराचे रुग्ण आणि वृद्धांनी काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी लस घेणे आवश्यक आहे. तसेच, इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) या विषाणूला हंगामी ताप म्हटले आहे. तसेच हा विषाणू पाच ते सात दिवस टिकतो.े