नगर – नगर जिल्ह्यात पाथर्डी येथे सोनार व्यापाऱ्यावर सुद्धा अशा पद्धतीने हल्ला झाला. तर दुसरीकडे नगर केडगाव येथे सुद्धा एकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. एकंदरीतच सरकार समाजकारणापेक्षा राजकारणामध्ये जास्त गुंतून राहिला आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था बोजवारा उडाला असून, कायदा सुव्यवस्था राहिली आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
दानवे हे नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहावर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, शहर प्रमुख संभाजी कदम, युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड, नगरसेवक योगीराज गाडे यांच्या सह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
दानवे म्हणाले, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना धमकण्याचा प्रकाराबद्दल त्यांनी सरकारला व पोलिसांना लेखी पत्र दिले आहे. या प्रकरणाची तात्काळ चौकशी होणे गरजेचे आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा चार दिवसांपूर्वी आपल्यावर कोणतरी पाळत ठेवून आहे, असे म्हणत त्यांनी या विषयासंदर्भात सरकारकडे लेखी पत्र सुद्धा दिले आहे. तर नुकताच एका आमदारावर सुद्धा असाच जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या पोस्टर संदर्भात विचारल्यानंतर दानवे यांनी म्हटले की, अजून कुठल्याही प्रकारच्या निवडणुका नाहीत हे लक्षात ठेवावे. वास्तविक पाहता कार्यकर्ते उत्साही असतात, प्रत्येक कार्यकर्ता आपला नेता हा मोठा व्हावा हा विषय घेऊन सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर बॅनर लावत असतात. तशातला हा प्रकार असावा व कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली ही भावना आहे, हा विषय राष्ट्रवादी पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचेही दानवे म्हणाले.
इडी कडे कोणतेही ठोस पुरावे नसताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना गोवण्याचा प्रयत्न भाजप सरकारने केला. त्यांच्यावर आरोप लावले, मात्र त्या आरोपाला ते घाबरले नाहीत. शंभर दिवस त्यांना तुरुंगात राहावे लागले ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. हे सर्वजण जाणता आहात सरकारच्या माध्यमातून त्यांना जेरीस आणण्याचा प्रकार केला जात आहे, असा आरोप दानवे यांनी केला असून उलट आता राऊत हे भाजप सरकारला निश्चितपणे जेरीला आणतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिम्मत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा असे आव्हान दिलेले आहे, मात्र या भाजपाकडे बहुमत नसल्यामुळे हे निवडणुका घेऊ शकत नाही हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही ते घेत नाहीत, असे दानवे म्हणाले. पुण्यातील कसबा व पिंपरी चिंचवड येथील पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आठ आठ दिवस या ठिकाणी येऊन थांबतात आमदार खासदारांसह अन्य फौजा या ठिकाणी आणून बसवलेल्या आहेत. त्यामुळे ही निवडणूक कोणी प्रतिष्ठेची केली आहे हे सांगण्याची गरज नाही. असा टोलाही दानवे यांनी यावेळी लागावला.