लोणी-धामणी -आंबेगावच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी इ. जिरायत पट्ट्यातदेखील बिबट्याने धुमाकूळ घातल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या तर दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असल्याने त्याचा परिणाम शेतीच्या कामावर होत असल्याचे शेतकरी सांगतात.
या परिसरात दोन तीन वर्षांपूर्वी रात्री अपरात्रीसुद्धा शेतकरी शेतात काम करत होते. एखाद्या कार्यक्रमाहून येताना रात्री कितीही उशिर झाला तरीही रस्त्याने प्रवास करताना कोणतीही भीती नव्हती; मात्र अलीकडील काही महिन्यांत बिबट्याच्या वावरामुळे सर्वच गणित बिघडले आहे.
गुरुवारी (दि. 23) रात्री साडेअकरा वाजता प्रा. अरुण गोरडे व त्यांच्या पत्नी मांदळेवाडीच्या ग्रामपंचायत सदस्या ज्योती गोरडे हे दोघेही मांदळेवाडी येथून एक लग्नाचा कार्यक्रम उरकून लोणी मार्गे निरगुडसर या ठिकाणी येत असताना श्री म्हाळसाकांत खंडोबा फाटा धामणी नजीक त्यांच्या गाडीला बिबट्या आडवा गेला.
साधारणता गाडीसमोर चाळीस ते पन्नास फूटावर बिबट्या आडवा गेला. चारचाकीमध्ये प्रवास करत असताना सुद्धा या दोघांची बोबडी वळली. बिबट्या समोर दिसल्यावर काय बाका प्रसंग उद्भवतो हे शब्दात सांगणे कठीण आहे, असे ज्योती गोरडे यांनी सांगितले.
बिबट्यांची संख्या कमी होईना
बिबट्या दिसला का शेतकरी, ग्रामस्थ वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करतात. पिंजराही लावला जातो. एकेदिवशी बिबट्या पिंजऱ्यात अलगद अडकला जातो.पण पुढे त्या बिबट्याला सोडून देतात का? बिबट्या निवारण केंद्रात ठेवतात? हा न सुटणारा प्रश्न आहे. बिबटे पकडले तरीही त्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे वनविभागाने या भागात बिबट्यांची संख्या मोजणे महत्त्चाचे आहे.