मुंबई – माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काही महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर केंद्रीय निवडणुक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केले आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते ठाणे शहर शिवसेना सचिव संजय मोरे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून माध्यमांना आता शिंदे गट न म्हणता शिवसेना असे संबोधावे अशी विनंती केली आहे.
मोरे यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हंटले आहे की, “17 फेब्रुवारीला भारतीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार यापुढे वृत्तवाहिनी वृत्तपत्र वृत्तांकन करताना शिंदे गट न संबोधता शिवसेना असे संबोधावे, अशी विनंती”
दरम्यान, शिवसेना नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह मिळाल्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने शिवसेनेची विविध भागातील कार्यलये ताब्यात घेण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांच्या गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार, राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील नेत्यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. तसेच राजकीय संबंध नसलेल्या व्यक्तींनीही केंद्रीय निवडणुक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून असे निर्णय लोकशाहीसाठी घातक असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.